यवतमाळ : राज्य शासनाने बीटी कपाशी बियाण्यांची किंमत १०० रुपयाने कमी केली आहे. मात्र बाजारात कृषी केंद्र संचालक शेतकऱ्यांना जुन्याच दरात बियाण्यांची विक्री करीत आहेत. यासाठी निर्णयापूर्वी बियाणे खरेदी केल्याची सबब पुढे करीत आहेत. यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लाखो रुपयांने लूट होत आहे. कृषी विभाग मात्र चढ्या दराने बियाणे विक्री करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. कृषी विभागाने ८ जून रोजी आदेश काढून बीटी कॉटन बोलगार्ड १, बीटी कॉटन बोलगार्ड २ यांच्या किमतीत १०० रुपयांनी कपात केली. बोलगार्ड २ ची ९३० रुपयांची ४५० ग्रॅमची बॅग ८३० रुपयांचे दर निश्चित केले आहे. बोलगार्ड १ आणि संकरीत कापसू (नॉन बीटी) या बियाण्याला बाजारपेठेत अधिक मागणी नसल्याने कृषी केंद्र चालकांनी हे बियाणे शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच विकले जात आहे. बोलगार्ड २ बाबत मनमानी सुरू आहे. कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांना जुन्याच दरात बियाणे विक्री करत आहेत. ज्या वाणाच्या बियाण्याला अधिक मागणी आहे, त्याचा कृत्रिम तुटवडा दर्शवून लूट केली जात आहे. शिवाय बियाणे कंपन्यांनी दराबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयानेही शासनाचा आदेश मान्य करत दरातील १०० रुपये कपात कायम ठेवली आहे. या उपरही काही बियाणे कंपन्या अजूनही हे दर स्वीकारायला तयार नाही. बऱ्याचदा होलसेल डिलरकडून नियमाप्रमाणे बियाणे पुरवठा झाल्यानंतरही घाऊक विक्रेते शेतकऱ्यांना वाढीव दरातच बियाणे देत आहेत. विशेष म्हणजे या अवैध प्रकाराकडे कृषी विभागातील पथकांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत चढ्या दराने विक्रीची एकही कारवाई जिल्ह्यात झालेली नाही. याचाच फायदा काही विक्रेत्यांकडून घेण्यात येत आहे. प्रशासनाने बंदोबस्त करावा. (कार्यालय प्रतिनिधी)
बीटीची चढ्या दरानेच विक्री
By admin | Updated: June 19, 2015 02:14 IST