धान्यच मिळेना : ५० रुपयांच्या धान्यासाठी बुडवावी लागते दिवसभराची अडीचशे रुपये मजुरी उमरखेड : तालुक्यातील सुकळी (जा) येथील स्वस्त धान्याचे दुकान गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. ते पूर्ववत सुरू करण्यात येऊन ग्रामस्थांना होणारा त्रास थांबवावा, या मागणीसाठी सुकळी येथील असंख्य नागरिकांनी बुधवारी तहसील कार्यालयावर धडक देऊन आपली कैफियत तहसीलदारांसमोर मांडली.सुकळी जा. येथील राशन दुकानदार संगीता दशरथ वानखेडे यांच्याकडे धान्य वितरणाची जबाबदारी होती. त्या बीपीएल, अंत्योदय, अन्नसुरक्षा आदी सर्व योजनांमधील लाभार्थ्यांना नियमितपणे मालाचे वाटप करीत होत्या. तरीदेखील गावातील काही ठराविक लोकांनी विनाकारण त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार केल्या. या तक्रारींची शहानिशा न करताच त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊन येथील राशन दुकान बंद करण्यात आले. त्यामुळे आता सुकळी येथील नागरिकांना उमरखेड येथील स्वस्त धान्य दुकानातून धान्य न्यावे लागत आहे. सुकळीपासून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या या नवीन दुकानात वयोवृद्ध महिला व पुरुषांना पायपीट करावी लागत आहे. अनेकांना तर स्वस्त धान्यासाठी आपली मजुरी बुडवून दिवसभर थांबावे लागत आहे. धान्य ५० रुपयाचे आणि त्यामागे २५० रुपयांची मजुरी जर बुडत असेल तर स्वस्त धान्य दुकानाचा गोरगरिबांना काय फायदा, असा सवाल ग्रामस्थांमधून होत आहे. त्यामुळे राशन दुकान सुकळी येथेच पूर्ववत सुरू ठेवावे. अन्यथा उमरखेड तहसील कार्यालयासमोर ४ आॅगस्ट रोजी महिलांसह ग्रामस्थ उपोषण आंदोलन करतील, असे निवेदन आज सुकळीवासीयांना तहसीलदार सचिन शेजाळ यांना दिले. या आंदोलनात चिन्नूमिया काजी, डॉ.अयूब पठाण, दादाराव पवार, शेषराव जाधव, हरिश्चंद्र राठोड, भीमराव वानखडे, संतोष वानखडे, अॅड.प्रफुल्ल वानखडे, वसंतराव बडेराव, सूर्यभान वानखेडे, प्रल्हाद जाधव, आत्माराम राठोड, पांडुरंग चव्हाण, शेख बशिर शेख भुसा, शेख सादिक, लक्ष्मीबाई वानखडे, परवीनबी अकबर, लक्ष्मीबाई काळे, रामी जाधव, रुक्माबाई चव्हाण, भागिरथा चव्हाण, ज्योती वानखडे, शोभाबाई वानखडे, मंदाबाई वानखडे आदींसह शेकडो नागरिकांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)सरपंचपदाचा दुरुपयोगसुकळी येथील महिला सरपंचांनी वरिष्ठांचे कोणतेही आदेश नसताना तसेच महसूलची कोणतीही सूचना नसताना आपल्या पदाचा दुरुपयोग करून जिल्हाधिकारी हे स्वत: दुकान व राशनकार्डधारकांची चौकशी करणार असल्याची दवंडी २९ जुलैला गावात दिली. त्यामुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सरपंचपदाचा गैरवापर करणाऱ्या महिला सरपंचावर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
रेशन दुकानासाठी सुकळीवासी तहसीलवर धडकले
By admin | Updated: July 30, 2015 02:18 IST