यवतमाळ : राज्यात अल्पमतात असलेल्या भाजप सरकारने दुष्काळी स्थितीसाठी कुठल्याही विशेष उपाययोजना केल्या नाही. कमी उत्पादन होवूनही शेतमालाचे भाव वाढलेले नाही. दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता भाजप सरकारने केली नाही. यासह विविध मुद्यांना घेवून काँग्रेस नागपूरच्या विधानभवनावर मोर्चा काढणार आहे. या आंदोलनाची सुरुवात १ ते ८ डिसेंबर दरम्यान केली जाणार आहे, अशी माहिती मोर्चाचे संयोजक डॉ. नितीन राऊत यांनी पत्रपरिषदेत दिली. १९७२ नंतर भीषण दुष्काळी स्थिती राज्यात उद्भवली आहे. दुष्काळामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला तातडीने कोरडवाहूसाठी हेक्टरी २५ हजार रुपये आणि बागायतीसाठी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. राज्यात पाणी, चारा याची गंभीर समस्या आहे. केवळ हमी भावात ५० रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. धानाचेही दर दोन हजार २०० रुपयांवरून एक हजार ७०० रुपयांवर आणले आहे. सरासरी उत्पन्नात ५० टक्केपेक्षा अधिक घट झाल्यानंतरही सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यास तयार नाही. आजही १५१ आमदार त्यांच्या विरोधात आहे. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी सूचना केली होती. मात्र प्रत्यक्ष सभागृहात पोलची मागणी करूनही मतदान घेण्यात आले नाही. आवाजी मतदानाच्या काळात सभागृहात झालेले चित्रिकरण सरकारने सार्वजनिक केल्यास त्यांचे पितळ उघडे पडणार आहे. त्यामुळे त्यांनी मागणी करूनही या चित्रिकरणाच्या प्रती उपलब्ध करून दिल्या नाही. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक पॅकेज द्यावे, सरकारने पुन्हा एकदा आपले बहुमत सिद्ध करावे, जवखेडा येथील हत्याकांडाची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी या मागण्यांसाठी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे. याची सुरुवात १ डिसेंबर रोजी धरणे देवून केली जाणार आहे. ४ डिसेंबरला सर्वत्र लाक्षणिक रास्ता रोको केला जाणार आहे. त्यानंतर ८ डिसेंबरला नागपूर येथील विधानभवनावर एक लाखांचा मोर्चा काढण्यात येणार आहे, असे या मोर्चाचे निमंत्रक विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.पत्रपरिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार, विजय खडसे, तातू देशमुख, राहुल ठाकरे, देवानंद पवार, अनिल गायकवाड, अरुण राऊत आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)
काँग्रेस काढणार विधानभवनावर मोर्चा
By admin | Updated: November 27, 2014 23:42 IST