यवतमाळ : दहावीच्या परीक्षेत दिग्रस येथील दीनबाई विद्यालयाचा विद्यार्थी राजन संजय जाधव हा जिल्ह्यात टॉपर ठरला असून त्याला ५०० पैकी ४९३ म्हणजे ९८.६० टक्के गुण आहे. तर यवतमाळ येथील डॉ. नंदूरकर विद्यालयाची विद्यार्थिनी सेजल राजेश माथुरकर आणि राणी लक्ष्मीबाई विद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी दिनेश शिरभाते जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकाच्या मानकरी ठरल्या आहे. दोघींनाही ९८.२० टक्के गुण मिळाले आहे. दहावीच्या परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल ८२.६६ टक्के लागला असून यंदाही पुन्हा मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी घोषित झाल्यानंतर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांची प्रचंड गर्दी दिसत होती. दहावीच्या परीक्षेत टॉपर ठरलेला राजन हा दिग्रस येथील महेशनगरातील रहिवासी आहे. त्याचे वडील संजय जाधव पुसद येथील फुलसिंग नाईक महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक असून आई सुचिता गृहिणी आहे. त्याचा लहान भाऊ सुजन सातव्या वर्गात शिकत आहे. त्याला पुढील शिक्षण घेऊन आयएएस व्हायचे असल्याचे त्याने सांगितले. राजन जिल्ह्यात टॉपर असल्याचे समजताच दिनबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक जयंत लेडे यांच्यासह शिक्षकांनी त्याच्या घरी जाऊन त्याचा सत्कार केला. जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरलेली आणि येथील नारिंगेनगरात राहणारी सेजल ही शेतकरी कन्या आहे. तिला गणित आणि संस्कृत या दोन विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले आहे. तिला डॉक्टर व्हायचे आहे. तिचे वडील राजेश हे मादनी गावचे माजी सरपंच आहे. आई अनिता गृहिणी असून लहान भाऊ वेदांत नवव्या वर्गात शिकतो. राणी लक्ष्मीबाई विद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी शिरभाते ही दत्तात्रेयनगरातील रहिवासी आहे. तिला दहावीच्या परीक्षेत ४९१ गुण मिळाले आहे. संस्कृत, विज्ञान आणि गणित या तीन विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहे. वडील एसटी महामंडळात वाहक असून आई पुष्पा शिक्षिका आहे. मोठा भाऊ अंकुश हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तिला भविष्यात डॉक्टर होऊन ग्रामीण रुग्णांची सेवा करायची आहे. विवेकानंद विद्यालयाचा विद्यार्थी अभिषेक प्रकाश मोरे ९७.८०, दिग्रसच्या राष्ट्रीय विद्यालयाचा विद्यार्थी प्रज्योत तानाजी काळे ९७.८० तर डॉ. नंदूरकर विद्यालयाचा विद्यार्थी प्रतीक भास्कर येवतकर हा ९७.४४ टक्के, लोकनायक बापूजी अणे विद्यालयाचा विद्यार्थी यज्ञेश दिलीपराव पायघन याने ९७.२० टक्के, दिग्रस येथील विद्या निकेतन स्कूलचा विद्यार्थी अभिजित खांदवे ९७.४० टक्के, यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी सलोनी मुळे ९७.२० टक्के, फ्री मेथॉडिस्टची विद्यार्थिनी ऋतुजा उदकवार ९७.२० टक्के, जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आदिती शिरभाते ९७ टक्के आणि बाभूळगावच्या प्रताप विद्यालयाची विद्यार्थिनी पूर्वा अजय जगताप ही ९७ टक्के गुण उत्तीर्ण झाले आहे. जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी अधिक आहे. मुलींची टक्केवारी ८५.३७ आणि मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८०.२५ टक्के आहे. जिल्ह्यातील ६२० शाळांपैकी तब्बल ४२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. जिल्ह्यातून ४० हजार ४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ४० हजार १८० विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी ३३ हजार २१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विशेष प्रावीण्यासह ५ हजार ९४७, प्रथम श्रेणीत १२ हजार ८८७, द्वितीय श्रेणीत ११ हजार ८४० आणि पास श्रेणीत दोन हजार ५३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. (नगर प्रतिनिधी)
जिल्ह्यात दिग्रसचा राजन टॉपर
By admin | Updated: June 7, 2016 07:40 IST