जमिनीला पडल्या भेगा : कापूस, सोयाबीनचे पीक धोक्यात, पाणी प्रश्न निर्माण होण्याची शक्यताघारफळ : बळीराजाने खरीप हंगाम सुरू होताच आपल्या शेतात कपाशी, सोयाबीन, ज्वारी, तूर पिकाच्या पेरणीला सुरुवात केली. पण पंधरा दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने बळीराजाच्या डोळ्यात आसवे दाटली आहेत. त्याचे डोळे आभाळाकडे लागले असून शेतजमिनीला मात्र भेगा पडलेल्या आहेत.निसर्गाच्या लहरीपणामुळे ओला व कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यंदा शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मशागतीची कामे उन्हाळ्यात तातडीने आटोपून घेतली. मृगाचा पाऊस बरसल्याने बळीराजाने पेरणीचीही कामे पूर्ण करून घेतली. मात्र, ऐन पिकांना अंकुर फुटण्याच्या काळातच पाऊस गुल झाला. नुकतीच उगवलेली पिके आता करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाऊस आज येईल, उद्या येईल एवढ्याच आशेवर शेतकरी दिवस कसेबसे लोटत आहे. शेतकऱ्यांना दोन वर्षे सतत नापिकी झालेली आहे. बँकेतून कर्ज काढून यंदा त्याने बियाणे खरेदी केले. मात्र, पावसाविना आता उगवलेले पीक वाया जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट पुन्हा कोसळणार, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या हाती पैसाच नसल्याने दुबार पेरणीची वेळ आल्यास शेत पडिक ठेवण्याशिवाय शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नाही. बियाणे उगवून रोपटी बहरू लागली की, शेतात निंदण, खुरपणी, खत देणे, डवरणी आदी कामांची लगबग सुरू होत असते. पण गेल्या १५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतातील कामेच ठप्प पडली आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला कामच नाही. याचा परिणाम छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांवर पडला असून बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी कमी दिसत आहे. या सर्व परिस्थितीमुळे आधीच कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (वार्ताहर)
पावसाची दांडी; कास्तकारांच्या डोळ्यात काळजीचे ढग
By admin | Updated: July 13, 2015 00:14 IST