हिवरा परिसरातील शेतकरी हवालदिल : काढणीच्या वेळेस निसर्गाचा फटका हिवरासंगम : रबी ज्वारीचे पीक काढणीस आले असताना भरलेल्या कणसावर चिकट्याचा प्रादूर्भाव झाला. वातावरणातील बदलामुळे चिकटा पडला असून यामुळे ज्वारीचे पीक धोक्यात आले आहे. महागाव तालुक्यातील हिवरासंगम, कासारबेहळ, वरोडी, कवठा या परिसरात मोठ्या प्रमाणात रबी ज्वारीची लागवड करण्यात आली. सध्या ज्वारी काढणीला आली आहे. असे असताना निसर्गाच्या निर्दयतेचा पुन्हा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. चिकट द्रव कणसावर पडले असून तो कणासातून पानावरही ओसंडून पडत आहे. जाणकार शेतकऱ्यांच्या मते चिकटा हा द्रव विषारी असून कणसातील ज्वारी खाण्यायोग्य आणि कडबा जनावरांना चारणे हानीकारण असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे चिकट्याचे आक्रमण प्रत्येक शेतात नसून अनेकांच्या ज्वारीला चिकट्याचा स्पर्शही झाला नाही. काही शेतकऱ्यांच्या ज्वारीवर मात्र चिकट्याने जोरदार आक्रमण केले आहे. जुन्या जाणत्या शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता ज्वारीवर चिकटा येतच नाही. चिकटा पाहण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले.आधीच सतत तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना शेतकरी झेलत आहे. अशा परिस्थितीत ज्वारीवरील चिकट्याने पुन्हा नवीन संकट उभे केले आहे. याबाबत कृषी विभागाशी संपर्क केला असता काही गावातील ज्वारीवर चिकटा पडला आहे. चिकटा निर्माण करणारी कणसातील अळी आणि वातावरणातील बदल कारणीभूत असू शकतो किंवा बियाण्यातील दोषसुद्धा त्याचे कारण असू शकते, असे त्यांनी सांगितले. वातावरणातील बदलामुळे चिकटा पडला असता तर सरसकट सर्वच ज्वारीवर चिकटा आला असता. परंतु काही शेतातील ज्वारीला चिकट्याचा स्पर्शही झाला नाही. एकरी २० ते २५ क्ंिवटल उत्पादन होईल, असा अंदाज असताना आता चिकट्याने संपूर्ण स्वप्नच उद्ध्वस्त केले आहे. कासारबेहळ येथील शेतकरी ज्योतीराम चव्हाण या शेतकऱ्याने उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले. एकरी एक क्ंिवटलही ज्वारी होणार नसल्याचे ते म्हणाले. कृषी विभागाने गंभीर दखल घेऊन उपाययोजना सूचवाव्या अशी मागणी आहे. (वार्ताहर)
रबीच्या ज्वारीवर चिकट्याचा प्रादुर्भाव
By admin | Updated: April 5, 2015 00:01 IST