पारवा परिसरात कॅम्पची गरज : योजनांच्या लाभापासून वंचित पारवा : विविध कामांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र अजूनही परिसरातील शेकडो नागरिकांकडे कार्ड नाही. यापूर्वी नोंदणी केलेल्या नागरिकांना अजूनही ओळखपत्र प्राप्त झाले नाही. लावण्यात आलेल्या कॅम्पमध्येही आता नोंदणी झाली नसल्याने अनेक नागरिकांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिसरातील वाढोणा, पार्डी, जाम, कालेश्वर, किन्ही, शरद, तरोडा, वघारा टाकळी आदी गावातील बहुतांश नागरिकांकडे आधार कार्ड नाही. गाव परिसरात यापूर्वी राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान नोंदणी करण्यात आली. परंतु अजूनही बहुतांश नागरिकांपर्यंत आधारकार्ड पोहाचले नाही. त्यांना विविध कामांसाठी अडचणी येत आहेत. काही दिवसांपूर्वी पारवा येथे आधार कार्ड नोंदणी कॅम्प घेण्यात आला. याठिकाणी मर्यादितच लोकांची नोंदणी करण्यात आली. बहुतांश नागरिकांना परत जावे लागले. रेशनकार्ड, शेती, घरकूल आदी योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. यापूर्वी नोंदणी करूनही घरपोच कार्ड पोहोचले नाही. डाक विभागात चौकशी केल्यानंतरही समाधानकारक ‘आधार’ मिळाला नाही. संगणकाव्दारे केलेला प्रयत्नही अयशस्वी झाला. नोंदणीसाठी काही ठिकाणी कॅम्प घेतले जात आहे. तेथे गर्दी होत आहे. नोंदणीसाठी आलेले पथक उपस्थित असलेल्या सर्वांची नोंदणी करण्यास टाळाटाळ करत आहे. असाच प्रकार १८ मार्च रोजी पारवा येथे झालेल्या कॅम्पमध्ये घडला. २०० ते २५० नागरिकांना नोंदणीशिवाय परत जावे लागले. पैसा खर्च करून, मजुरी बुडवून मिळेल त्या साधनाव्दारे या नागरिकांनी कॅम्पमध्ये हजेरी लावली होती. मात्र आधार कार्डसाठी नोंदणीही झाली नसल्याने त्यांचा वेळ, पैसा व्यर्थ गेला. आधार कार्ड नोंदणीसाठी परिसरात कॅम्प लावावे अशी मागणी आहे. ही सोय झाल्यास आधारकार्डचा प्रश्न निकाली निघू शकतो. (वार्ताहर)
‘आधार’चा प्रश्न गंभीर
By admin | Updated: April 6, 2016 02:32 IST