पुसद : यवतमाळ हा जिल्हा भौगोलिक दृष्ट्या मोठा असल्याने त्याचे विभाजन करण्याची गरज आहे. पुसद जिल्हा निर्मितीसंदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करू तसेच जिल्हा निर्मितीसाठी पुसद विकास मंचला सहकार्य करू, असे आश्वासन पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. पुसद विकास मंचच्यावतीने येथील शिवाजी चौकात पुसद जिल्हा निर्मितीसाठी दोन दिवस ठिय्या आंदोलन करण्यात आले. पुसद येथील जनता दरबार आटोपून पालकमंत्री शनिवारी पहाटे ५ वाजता शिवाजी चौकातील ठिय्या आंदोलन स्थळी आले. त्यांनी विकास मंचच्या सदस्यांशी सकारात्मक चर्चा केली. त्यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणजे यवतमाळ हा जिल्हा मोठा आहे. त्याचे विभाजन करून नवीन जिल्हा करण्यास काहीही हरकत नाही. पुसद विकास मंचने जिल्हा निर्मितीचा प्रश्न हाती घेतला असून त्याला मी संपूर्ण सहकार्य करील, असे त्यांनी सांगितले. १२ जून रोजी सकाळी ११ वाजता पुसद विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात पालकमंत्र्यांच्या वाहनाला घेराव घातला होता. त्यावेळी ना. राठोड यांनी जनता दरबार आटोपल्यानंतर ठिय्या आंदोलनाला भेट देईल, असे सांगितले होते. पुसदचा जनता दरबार पहाटे ५ वाजता संपला. यानंतर पालकमंत्री थेट ठिय्या आंदोलनस्थळी आले. या ठिकाणी विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भेटीसाठी रात्र जागून काढली याचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले. यावेळी पुसद विकास मंचचे अॅड. सचिन नाईक, निशांत बयास, रवी ग्यानचंदाणी, योगेश राजे, अॅड. चंद्रशेखर शिंदे, राहुल कांबळे, पंकज पारधे, अभय गडम, ज्ञानेश्वर तडसे, बळवंत मनवर, अतिक भाई, अॅड. प्रशांत कागदेलवार, समद भाई, मुश्ताक भाई, प्रकाश त्र्यंकटवार, कैलास जगताप, किरण देशमुख उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
पुसद जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन
By admin | Updated: June 15, 2015 02:37 IST