यवतमाळ : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे खचलेले मनोधैर्य उंचाविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी जिल्हाप्रशासनाच्या वतीने बळीराजा चेतना अभियान जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व सोळाही तालुक्यातील गावागावांत हजारांवर कीर्तन, पथनाट्य, प्रबोधन मेळावे, कृषी मेळावे यातून बळीराजाचे मनोबल उंचावण्याचे काम अभियानाच्या माध्यमातून चालू आहे. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विकासात्मक योजना, जोडधंदे यांची सर्वकष माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी. शेतकऱ्यांना जिल्हाप्रशासन आपल्या पाठीशी उभे आहे, असा विश्वास निर्माण करण्याचे काम सुरू आहे. सोळाही तहसी लमधील हजारांवर गावात प्रबोधनकार, कीर्तनकार आणि प्रथनाट्य, रांगोळीकार यांच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम सुरू आहे. यवतमाळ तालुक्याचे तहसीलदार सचिन शेजाळ, कळंबचे एस.डी.काकडे, बाभूळगावचे तहसीलदार गोरडे, पुसद तहसीलदार संजय गरकल, मारेगाव तालुक्यात तहसीलदार संतोश यवलीकर, पांढरकवडा तहसीलदार शैलेश काळे, झरीजामणी तालुक्यात ए. जी. देवकर, आणीर्चे तहसीलदार रजनलवार, दारव्हा येथील तहसीलदार राऊत, दिग्रसचे तहसीलदार नितीन देवरे, नेर येथील तहसीलदार शरयू आडे, राळेगावचे हेमंत गागुर्डे, घाटंजीचे तहसीलदार महादेव जोरवर, वणीचे तहसीलदार आर. बी. भोसले, उमरखेडचे कांबळे, महागावचे तहसीलदार पांडे गावोगावी कीर्तन, भजन, रांगोळी, प्रबोधनपर कार्यक्रम, चर्चासत्र, निबंधस्पर्धा, प्रगतशील शेतकरी मेळावे अशा विविध माध्यमातून शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्याचे काम करीत आहेत. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांसाठी सर्व तालुक्यांत जनजागृती मेळावे
By admin | Updated: February 5, 2016 01:55 IST