पाणीटंचाईवर प्रभावी उपाय नाही : रस्ते आणि विजेच्या प्रश्नामुळे नागरिक हतबलघाटंजी : प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून तालुक्यातील प्रश्न दुर्लक्षित आहे. पाणी, रस्ते, नाल्या, वीज या व इतर समस्या निकाली काढण्यासाठी कुणाकडूनही प्रभावी उपाययोजना केल्या जात नाही. याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. तालुक्यातील अनेक गावांना उन्हाळ्यात भीषण पाणीप्रश्नाला सामोरे जावे लागते. आजही अनेक गावांमध्ये हा प्रश्न गंभीर झालेला आहे. विहिरींचे अधिग्रहण, नवीन विंधन विहिरी, टँकर या तकलादू उपाययोजना केल्या जातात. उन्हाळा संपताच पाणीटंचाई हा विषयही मागे पडतो. परिसरात मोठमोठ्या नद्या आहेत. त्यावर बांध टाकण्यात आलेले आहे. मात्र त्यात पुरेसे पाणी अडत नाही. परिसरातील जलस्रोतांची पातळी टिकून राहण्यास या उपाययोजना प्रभावी ठरू शकतात. मात्र त्यादृष्टीने प्रयत्न होत नाही. विविध गावांसाठीचे रस्ते खड्डामय झालेले आहे. वाहनधारकांना मार्ग काढण्यासाठी चांगला रस्ता शोधावा लागतो. खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटून अपघाताच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. ही मुख्य रस्त्याची समस्या आहे. गावातील अंतर्गत रस्तेही दयनीय स्थितीत आहे. काँक्रिट रस्त्यांना भेगा पडलेल्या आहे. काही ठिकाणी काँक्रिट उखडल्याने खड्डे पडलेले आहेत. यावरून सदर कामांचा दर्जा कसा असेल, हे स्पष्ट होते. कामात गैरप्रकार झाल्याचे धडधडीत दिसत असतानाही संबंधित कंत्राटदार अथवा अधिकाऱ्यांवर कारवाईचे सौजन्य दाखविले जात नाही. गावांमध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाहीत. असल्या तरी कचऱ्याने तुंबलेल्या आहेत. रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी आणि जागोजागी तयार झालेली गटारं यामुळे लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सांडपाण्याची दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव या बाबी झोप उडविणाऱ्या ठरत आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी हा विषय कानावरही घेत नाही. पदाधिकारी आणि ग्रामसचिवांचे मात्र त्यांच्यावर नियंत्रण नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांकडे मांडलेले प्रश्न सोडविले जात नाही. सांडपाण्याच्या प्रकारावरून गावांमध्ये भांडणतंट्यांचे प्रकार वाढलेले आहे. तालुक्याच्या काही गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. याचा परिणाम काही लोकांच्या व्यवसायावर होतो. पाणीपुरवठ्याच्या योजनाही सदर बाबीमुळे प्रभावित होतात. विद्युत कंपनीचे अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहात नाही. ग्रामीण भागात एकदा गुल झालेली वीज केव्हा येईल, याचा कुठलाही नेम नाही. आधीच विजेचा कमी तास पुरवठा, त्यातही लपंडाव यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. या सर्व प्रश्नांकडे तालुका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)
घाटंजी तालुक्यातील समस्या वाऱ्यावर
By admin | Updated: May 9, 2016 02:31 IST