ग्रामीण भागातील साईडपट्ट्या निकामी
पांढरकवडा : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या साईडपट्ट्या नादुरुस्त झाल्या असून या साईडपट्ट्यांवर आता मोठ्या प्रमाणावर झाडे, झुडपे वाढली आहे. यामुळे वाहन चालवताना अनेकदा अंदाज येत नाही. परिणामी अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही झाडे, झुडपे कापून साईडपट्ट्या दुरुस्त करण्यात याव्या, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
पांढरकवडात वाहतुकीची कोंडी कायम
पांढरकवडा : शहरात जिथे जागा मिळेल तिथे वाहने उभी केली जात असल्याने तसेच रस्त्यावर अनेक दुकानदारांनी आपली दुकाने थाटल्यामुळे वाहतुकीची कोंडी कायम राहत असल्याचे चित्र आहे. वाहतुकीची कोंडी ही बाब आता नित्याचीच झाली असून प्रशासनही याबाबत उदासीन असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे.
ओबीसी आरक्षणासाठी निदर्शने आंदोलन
वणी : केंद्र सरकारने २०२१ च्या जनगणना कार्यक्रमात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी व भारतीय संविधानाच्या कलम २४३ (ड) (६) आणि कलम २४३ (ट) (६) मध्ये सुधारणा करून ओबीसी संवर्गाला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीमध्ये ओबीसी संवर्गाला २७ टक्के राजकीय आरक्षण राहील, अशी तरतूद करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांना घेऊन ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांच्या नेतृत्वात २२ सप्टेंबरला जिल्हा कचेरीसमोर निदर्शने करण्यात येणार आहे. यात ओबीसी बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन भालचंद्र चोपणे, विजय पिदुरकर, मोरेश्वर पावडे, देविदास काळे, गोविंद थेरे, गणपत लेडांगे, प्रा. टिकाराम कोंगरे, दिनकर पावडे, सुरेश बरडे, विवेकानंद मांडवकर, विलास मांडवकर, रवी देवाळकर यांनी केले आहे.