केंद्र सरकारने प्रत्येक गावात शुद्ध पाणी पोहोचविण्याची घोषणा केली. मात्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेत वीज देयके अडथळा ठरत आहेत. अनेकदा ग्रामपंचायतीला उत्पन्नापेक्षा देयके जास्त येत आहे. त्यामुळे ही देयके भरावी कशी, अशी समस्या ग्रामपंचायतीसमोर असून देयके थकीत आहे. ऑगस्ट महिन्यात महावितरणने थकीत बिल वसुली मोहीम तालुक्यात राबविली आणि ज्यांची देयके थकीत आहे, त्यांचा वीजपुरवठा तोडण्यात आला. यामध्ये अनेक ग्रामपंचायतींच्या नळयोजनेचा वीजपुरवठा तोडण्यात आला. यात धामणी, बोटोणी, म्हैसदोडका, शिवनाळा, बुरांडा, हटवांजरी, जळका, घोगुलदरा, सालई पोड, सराटी, सगनापूर, चिंचमंडळ, खंडणी, अर्जुनी, आदी गावांतील वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. कोरोनामुळे बहुतांश नागरिकांनी घर व पाणी कर भरणे ठप्प केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे.
अनेक ग्रामपंचायतींच्या नळयोजनांचा वीजपुरवठा कापला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:45 IST