उमरखेड (कुपटी) : पिकांवर सध्या विविध किडींनी आक्रमण केले असून, कीड नियंत्रणात आणताना शेतकरी मेटाकुटीस आले असतानाच आता उमरखेड तालुक्यातील कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. खत आणि कीटकनाशकांची कृत्रिम टंचाई निर्माण करून ज्यादा दराने विक्री केली जात आहे. हा प्रकार कृषी विभागातील अधिकाऱ्यांना माहीत असला तरी कारवाई मात्र केली जात नाही. उमरखेड तालुक्यात यावर्षी शेतकरी हतबल दिसत आहे. सुरूवातीला पावसाची दडी. त्यानंतर दुबार, तिबार पेरणीचे संकट़ पोळ््यापासून पावसाला सुरूवात झाली. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र किडींनी आक्रमण केले. कीड नियंत्रणासाठी किटकनाशक आणि पिकांच्या वाढीसाठी खतांची आवश्यकता आहे. परंतु नेमकी हिच वेळ साधून कृषी केंद्र चालकांनी पिळवणूक सुरू केली आहे. तालुक्यातील उमरखेड, ढाणकी, विडूळ, चातारी, ब्राह्मणगाव, बिटरगाव, पोफाळी, मुळावा, निंगणूर, जेवली, भवानी, दराटी आदी गावांमध्ये कृषी साहित्याची ज्यादा दराने विक्री केली जात आहे. तालुक्यात कृषी हंगामाच्यावेळी युरिया मुबलक होता. मात्र सुरूवातीपासून पावसाने दडी मारल्याने युरियाची मागणी नव्हती. आता पाऊस चांगला झाल्याने आता युरियाची मागणी वाढली आहे. मात्र आता कृषी केंद्र चालक युरियाची कृत्रिम टंचाई करीत आहे. ज्यदा दर दिल्यास युरिया तात्काळ उपलब्ध करून दिल्या जातो. अनेक कृषी केंद्र चालकांनी आपल्या गोदामात युरियाची साठवण करून ठेवली आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी वाटेल ती किंमत मोजायला तयार असतो. यासोबतच औषधीची ही अशिच अवस्था आहे. (वर्ताहर)
कृषी केंद्रात शेतकऱ्यांची लूट
By admin | Updated: September 21, 2014 23:58 IST