लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपालिकेने पावसापूर्वीचे नियोजन करण्यासाठी लाखोंची तरतूद केली आहे. असे असले तरी प्रत्यक्षात पावसाळ्यापूर्वी हाती घेतली जाणारी कामे शहरात झाली नाही. थातूरमातूर कामांमुळे यवतमाळकर संकटात सापडणार आहे.यवतमाळ नगरपरिषदेने २०२०-२१ या वर्षाकरिता अडीचशे कोटी रुपयांचे बजेट अर्थसंकल्पात सादर केले. या बजेटमध्ये ६६ लाख रुपयांचे नियोजन विविध उपाययोजनांवर दाखविण्यात आले.त्यामध्ये प्रामुख्याने शहरातील मोठे नाले सफाई करण्यासाठी २० लाख रुपयांचे बजेट आहे. काटेरी झाडे झुडूपे तोडण्यासाठी सहा लाख रुपयांचे नियोजन आहे. मोकाट जनावरांना पकडण्यासाठी १० लाख रुपयांचे बजेट आहे तर घनकचरा विल्हेवाट लावण्यासाठी ३० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.अर्थसंकल्पातील ही आकडेवारी अनेकांना सुखावणारी आहे. प्रत्यक्षात नगरपालिकेचे काम पाहिले तर निर्धारित निधी खर्च झाला किंवा नाही, अशी शंका नक्कीच उपस्थित होते. सध्या शहरातील कुठल्याही भागात गेले तरी नाल्या तुंबलेल्या दिसतात. मुख्यत: शहरातील प्रमुख नाल्यांकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष झाले. या नाल्यांमध्ये प्रचंड कचरा साचला आहे. हा कचरा पुलाच्या तोंडावर जाऊन फसला आहे. त्यामध्ये थर्माकॉल, प्लॅस्टिकच्या बॉटल आणि इतर घाण साचली आहे. पाऊस आला तर संपूर्ण पाणी पुलाजवळ अडणार आहे. यातून खोलगट वस्त्यांमध्ये पाणी शिरुन हाहाकार उडण्याची शक्यता आहे.साध्या नागरिकांना हा कचरा डोळ्याने दिसतो आहे. नगरपालिकेच्या नजरेत हा कचरा का येत नसेल हा खरा प्रश्न आहे. काही भागामध्ये तर मोठ्या नाल्यांमध्ये कचऱ्याचे डोंगर उभे केले आहे. हा भला मोठा कचरा नाल्यांमध्ये ठेवणे कितपत योग्य आहे असा प्रश्न या ठिकाणावरुन जाणाºया प्रत्येकांनाच पडतो. मागासवस्त्यांमध्ये हे चित्र पावसाळ्यापूर्वीचे आहे.जून महिन्याला प्रारंभ होऊन आठवडा झाला. यानंतरही नगरपालिकेची यंत्रणा जागेवरुन हलायला तयार नाही. काही भागात नावापुरते जेसीबी यंत्र फिरले. थोडा कचरा काढला, पुन्हा दोन दिवसांनी स्थिती जैसे थे अशीच झाली. अनेक नाल्यांमध्ये झाडे झुडूपे वाढली आहे. काही नाल्यातील पाणी तर वर्षभर रस्त्यावरून वाहत आहे. मग सफाई करणारे कर्मचारी नेमके काम कुठे करतात हा खरा प्रश्न आहे. आता पावसाळ्याच्या तोंडावर शहरात विविध भागात पाणी तुंबून पूरपरिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. नगरपरिषद प्रशासन यानंतरही लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पालिकेत चालले तरी काय ?प्रभागांमध्ये कुठलाही प्रश्न निर्माण झाल्यावर नागरिक नगरसेवकांकडे जातात. यावेळी आम्हाला सफाई कामगार मिळत नाही, मुख्याधिकाऱ्यांकडूनही सहकार्य मिळत नसल्याचे नगरसेवक सांगतात. तर मुख्याधिकारी आपण सर्वांनाच मदत करतो असे म्हणतात. नगराध्यक्षांची धडपड आहे पण प्रशासनाची त्यांना तेवढी साथ मिळत नाही. या स्थितीत शहरातील नियोजन करताना अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण होतो.
नियोजन लाखांचे, उपाययोजना शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST
अर्थसंकल्पातील ही आकडेवारी अनेकांना सुखावणारी आहे. प्रत्यक्षात नगरपालिकेचे काम पाहिले तर निर्धारित निधी खर्च झाला किंवा नाही, अशी शंका नक्कीच उपस्थित होते. सध्या शहरातील कुठल्याही भागात गेले तरी नाल्या तुंबलेल्या दिसतात. मुख्यत: शहरातील प्रमुख नाल्यांकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष झाले. या नाल्यांमध्ये प्रचंड कचरा साचला आहे. हा कचरा पुलाच्या तोंडावर जाऊन फसला आहे.
नियोजन लाखांचे, उपाययोजना शून्य
ठळक मुद्देमान्सूनपूर्व कामाला मुहूर्तच नाही : नगरपरिषदेचा ढिम्म कारभार, यवतमाळकरांना संकटाचा सामना करावा लागणार