यवतमाळ : जलयुक्त शिवार अतिशय महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. भविष्यात यातून पाणीटंचाईवर पुर्णपणे मात होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाअंतर्गत होत असलेली कामे गुणवत्तापुर्वक होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अशा कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता पथकासह त्रयस्थ संस्थेची नेमणूक करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी जलयुक्त शिवारची कामे पूर्ण करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले. महसुल भवन येथे जलयुक्त शिवार तसेच सिमेंट नाला बांधातील गाळ काढण्याच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, उपजिल्हाधिकारी फडके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, उपविभागीय अधिकारी विकास माने, उपवनसंरक्षक धामगे यांच्यासह पाणी पुरवठा, जलसंपदा, कृषी आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जलयुक्त शिवार अंतर्गत होत असलेली सर्व कामे पावसाळ्यापुर्वी होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने संबंधीत विभागांनी कामाला गती देणे आवश्यक आहे. या कार्यक्रमांतर्गत होत असलेली कामे अंदाजपत्रकानुसार तसेच निकषाप्रमाणे केली जात आहेत का याची पाहणी त्रयस्थ संस्था नेमूण त्यांच्याकडून केली जातील. जिल्हास्तरावर बांधकाम व जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांची जिल्हा दक्षता पथकाची नेमणूक केली जाईल. या पथकाकडून कामाची गुणवत्ता तसेच निकषाप्रमाणे कामे होत आहेत का हे पाहल्या जातील. यात त्रृट्या किंवा गैरप्रकार आढळूण आल्यास संबंधीतांवर निलंबनाची कार्यवाही केली जातील, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात कृषी व वन विभागाचे अनेक सिमेंट नाला बंधारे आहेत. या बंधाऱ्यामधील गाळ काढण्यासोबतच खोलीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कोल्हापुरी पध्दतीच्या बंधाऱ्याचा सुयोग्य वापर होण्यासाठी त्याचा अभ्यास करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत होत असलेल्या प्रत्येक कामाचे मुल्यमापन होणार आहे. आपण स्वत: प्रत्येक कामास भेटी देणार असून इतर जिल्ह्याचे अधिकारीही कामांना भेटी देवून पाहणी करणार आहे. त्यामुळे सर्व कामे गुणवत्तापुर्वक आणि वेळेत करा, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या. (प्रतिनिधी)
पावसाळ्यापूर्वी कामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2015 02:18 IST