मोहदी : महागाव तालुक्यातील मोहदी परिसरातील अनेक पांदण रस्ते पूर्णत: दुर्लक्षित आहेत. त्यामुळे पांदण रस्ते नसलेल्या गावातील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना आहे. त्यातून पांदण रस्त्याचा विकास करता येणे शक्य आहे. विविध योजनातून पांदण रस्ते मोकळे करणे त्यांचे रुंदीकरण करणे सहज शक्य आहे. सोबतच पांदण रस्ते पक्के करण्यासाठीही सुविधा त्यात आहे. तथापि प्रशासकीय यंत्रणा व जनतेतील समन्वयकाअभावी आणि काही प्रमाणात तांत्रिक अडचणीमुळे पांदण रस्ते रखडलेली आहेत. त्यामुळे शेतात ये-जा करणारे शेतकरी जनावरे यांचे पावसाळ्यात प्रचंड हाल होतात. या परिसरातील मोहदी ते काळी दौ या जुना पांदण रस्ता यापूर्वी गाडी बैलाचा होता. त्यावरून बैलबंडी सहज जात होती. तथापि, सध्या या पांदण रस्त्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे बैैलगाडी नेणे कठीण झाले आहे. मोहदी ते सातघरी पांदण रस्त्यात तर पावसाळ्यात चिखलामुळे जनावरे फसतात. त्यांच्यासोबतच शेतकऱ्यांचेही हाल होतात. या पांदण रस्त्याची थोड्या अंतरापर्यंत रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेतच आहे. या पांदण रस्त्याने जाणे कठीण झाले आहे. या पांदण रस्त्याने पायदळ जाणे बैलगाडी नेणे कठीण होते. शेतातील पीक घरी आणणे कठीण जाते.बैलाची प्रचंड दमछाक होते. पांदण रस्त्यावर काही ठिकाणी झालेले अतिक्रमणसुद्धा रस्ता अरुंद होण्यास कारणीभूत आहे. परिसरातील पांदण रस्ते शिव रस्ते हे पूर्वी जेवढ्या रुंदीचे होते ते आता तसे राहिले नाहीत. दिवसेंदिवस पांदण आणि शिवरस्ते अरुंद होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर शेवटच्या टोकाला शेती असलेल्या शेतकऱ्यांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांचा वाद होतात. त्यात एकमेकांची डोके फोडण्यापर्यंत मजल जात. प्रकरण हातघाईपर्यंत जाऊन शेवटी पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालयातही पोहोचते. (वार्ताहर)
पांदण रस्ते अद्याप दुर्लक्षितच
By admin | Updated: May 25, 2015 02:24 IST