काँग्रेसची कार्यशाळा : पदाधिकाऱ्यांनी मांडल्या नेत्यांपुढे व्यथायवतमाळ : काँग्रेसमध्ये गत काही वर्षांपासून प्रस्थापितांचे प्रस्थ वाढले आहे. नेत्यानंतर त्यांचा गोतावळाच विविध पदावर आरुढ होतो, यामुळे सामान्य कार्यकर्ताच काँग्रेसपासून दुरावला आहे. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर पक्षातील प्रस्थापितांनी केलेली कोंडी दूर करण्याची गरज असल्याची भावना अमरावती विभागातून आलेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी नेत्यांपुढे व्यक्त केली. यवतमाळात अमरावती विभागीय काँग्रेसची कार्यशाळा व चर्चासत्राचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ या पाच जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक होते. त्यांच्या पुढेच कार्यकर्त्यांनी पाढा वाचला. बुलडाणा येथील शाम उमाळकर म्हणाले, पक्षाच्या चिन्हावर एकदा आमदार झालेली व्यक्ती त्या पुढची सर्व पदे आपल्या गोतावळ्यापुरतीच मर्यादित ठेवतात. त्यामुळे दोन पेक्षा अधिक वेळा कोणालाही कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी देऊ नये, असा नियमच करावा. सध्या युवक काँग्रेसमध्ये निवडणुकीतून पदाधिकारी ठरतात. ही पद्धत अतिशय चुकीची असून प्रस्थापितांची मुले मोठ्या पदावर जाऊन बसतात, असे ते म्हणाले. यवतमाळचे अशोक बोबडे यांनी पक्षाजवळ कार्यकर्ता नसल्याची खंत व्यक्त केली. पूर्वी काँग्रेस सेवादल, युवक काँग्रेस, एनएसयुआय पूर्ण ताकदीने सक्रिय असायचे. यातून कॅडरबेस कार्यकर्ता पक्षाजवळ होता. यातूनच आम्ही घडलो. मात्र आज साधा निषेध नोंदविण्यासाठीही रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता काँग्रेसकडे नाही, राजकारणातील सक्रिय महिलांना उमेदवारी देताना डावलून प्रस्थापितांच्या सौभाग्यवतींनाच पुढे केले जाते. आज भाजपा सरकारविरोधात जनतेत मोठी नाराजी आहे. मात्र विरोधक म्हणून काँग्रेस ती कॅश करू शकत नाही. कॅडर बेस कार्यकर्ता तयार करण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. अकोला येथील मदन भरगड, पुसदचे डॉ. वजाहत मिर्झा, अॅड. सचिन नाईक, घाटंजी येथील राजेश निकोडे, अमरावती येथील किशोर बोरकर, नसीम खान, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष छाया दंडाळे, यवतमाळच्या मिनाक्षी वेट्टी, सिकंदर शाह, वाशिमचे दिलीप भोजराज यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नेत्यांनी त्यांच्या भावना श्रेष्ठींपुढे मांडण्याचे आश्वासन दिले. (कार्यालय प्रतिनिधी) काँग्रेसमधून कार्यकर्ता संपल्याची खंत चर्चासत्राच्या सुरुवातीला काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांनी व आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे ‘काल-आज आणि उद्याची स्थिती’ यावर आपली मतमतांतरे व्यक्त केली. पहिल्या सत्रात विधानसभा व लोकसभेतील पराभवावरूनच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाल्या. मात्र नंतर चर्चेचा सूर हा पक्षबांधणी व कार्यकर्त्यांची स्थिती यावर केंद्रीत करण्यात आला. अनेक दिग्गज पक्षात असूनही पदापासून वंचित असल्याचे वास्तव यावेळी पुढे आले. माजी आमदार संजय देशमुख, विजय खडसे, विजयाताई धोटे यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, नरेंद्र ठाकरे, रमेश चव्हाण, राहुल ठाकरे, संध्याताई सव्वालाखे, प्रीतिला दुधे, अरुण राऊत, संतोष बोरेले, भारत राठोड, नितीन मिर्झापुरे आदी उपस्थित होते.
प्रस्थापितांमुळे पक्षाची कोंडी
By admin | Updated: February 22, 2016 02:35 IST