शबरी योजना : जिल्ह्यासाठी साडेसात कोटींचा निधीयवतमाळ : वर्षानुवर्ष उघड्यावर जीणं जगणाऱ्या पारधी आणि कोलाम बांधवांना आता हक्काचे घरकूल मिळणार आहे. आदिवासी विकास विभागामार्फत शबरी योजनेच्या माध्यमातून साडेसात कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला आहे. घरकूल लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी ३, ४ आणि ५ आॅगस्ट रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश जिल्हा परिषदेने संबंधित ग्रामपंचायतींना दिले आहे.पारधी आणि कोलाम बांधवांसाठी शबरी घरकूल योजनेच्या माध्यमातून घरकूल बांधून दिले जाणार आहे. प्रत्येक लाभार्थ्याला या योजनेतून एक लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यातूनच घरकूल बांधायचे आहे. मात्र लाभार्थी निवडीसाठी विशेष ग्रामसभा आवश्यक आहे. या ग्रामसभा जिल्ह्यात ३, ४ व ५ आॅगस्टला घेण्याचे निश्चित झाले आहे. ग्रामसभेतून निवडलेल्या नावावर शिक्कामोर्तब करून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हा निधी लाभार्थ्यांकडे वळता करणार आहे. (शहर वार्ताहर)दारिद्र्यरेषेची अट शिथिलआदिवासी बांधवांची घरकुलाची प्रतीक्षा यादी संपली आहे. घरकुलासाठी दारिद्र्य रेषेखालील कुटुंब शोधूनही सापडत नाही. त्यामुळे घरकुलासाठी कोलाम बांधवांना दारिद्र्य रेषेची अट शिथिल करण्यात आली आहे.आदिवासी विकास विभागाकडून शबरी घरकूल योजना हाती घेण्यात आली आहे. ग्रामसभेतून लाभार्थ्यांची नावे येणार आहे. त्यानंतर घरकूल योजनेच्या कामाला सुरुवात होईल. - डॉ. मल्लीनाथ कलशेट्टीमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, यवतमाळ --------------------------------------------------आदिवासी विकास विभागाचा साडेसात कोटींचा निधी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे प्रलंबित होता. मार्गदर्शक सूचनेअभावी हा निधी पडून होता. याबाबत कार्यालयाने मार्गदर्शन मागविले आणि त्यातून हा तोडगा निघाला आहे. - विश्वास डाखोरेप्रभारी प्रकल्प अधिकारी, आदिवासी विभाग, पांढरकवडा
पारधी आणि कोलाम बांधवांना हक्काचे घरकूल
By admin | Updated: August 3, 2015 02:13 IST