पारवा : वातावरणातील बदल आणि जागोजागी पसरलेली घाण या कारणांमुळे पारवा परिसराला आजाराने ग्रासले आहे. घराघरांमध्ये तापाचे रुग्ण आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत. दररोज विविध रुग्णालयांमध्ये सुमारे ५०० ते ६०० लोकांवर उपचार सुरू आहे. जिल्हा आरोग्य विभागाने ही साथ नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहले. काही भागात पाणी शिरल्यामुळे जागोजागी मोठमोठे डबके तयार झाले आहे. याशिवाय गावातील खतांचे ढिगारे, तुंबलेल्या नाल्या, गावाशेजारीच असलेली हागणदारी आदी कारणांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला. दुर्गंधी वाढली. पिण्याचे पाणी अशुद्ध झाले. या व इतर कारणांमुळे तापासह इतर आजारांनी तोंड वर काढले. पारव्यासह परिसरातील प्रत्येक गावात घराघरांमध्ये तीन ते चार रुग्ण आढळून येत आहे. काही ठिकाणी तर कुटुंबातील सर्व सदस्यांना तापाची लागण झाली आहे. खासगी रुग्णालयात दररोज १०० ते २०० तर प्राथमिक आरोग्य केंद्रात ३०० च्या जवळपास रुग्णांची नोंदणी होत आहे. तीन ते चार दिवसपर्यंत ताप उतरत नसल्याने नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. मोकळ्या जागेतील वाढलेले गाजरगवत याशिवाय इतर निरूपयोगी झाडे या आजाराला वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. ग्रामपंचायतींकडून पावसाळ्यापूर्वी कुठलीही खबरदारी घेतली जात नाही. परिणामी नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. यातील सर्वात मोठा प्रश्न आरोग्याचा आहे. तुंबलेल्या नाल्या साफ करण्याचे सौजन्य ग्रामपंचायती दाखवित नाही. पावसाचे पाणी वाट मिळेल तिकडे वाहून जाते. या प्रकारात जलस्रोतही दूषित होतात. विहीर किंवा हातपंपाचे पाणी शुद्ध करण्यासाठी ग्रामपंचायतींजवळ ब्लिचिंग पावडरशिवाय दुसरा उपाय नाही. हा उपाय अतिशय तकलादू आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून हालचाली केल्या जात नाही. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि सदस्यही या विषयासंदर्भात गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी नागरिकांना मात्र तापासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
पारवा परिसरात तापाची साथ
By admin | Updated: September 15, 2014 00:25 IST