सुरेंद्र राऊत - यवतमाळ पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडणुकीची पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. १४ सप्टेंबर ही तारीख निश्चित झाल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रभाव यावर दिसत आहे. नेतेमंडळी विधानसभेसाठी सोईस्कर ठरेल अशाच पध्दतीने राजकीय समिकरण जुळविण्याच्या हालचाली करत आहे. या निवडप्रक्रियेत स्थानिक आमदारांकडून पाच वर्षे विरोधात असलेल्या गटाला आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न सुरू आहे. प्रसंगी स्वपक्षातीलच दावेदार निष्ठावंताला पदापासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहे. काही पंचायत समितीमध्ये काँग्रेसला राष्ट्रवादीसोबत, काही ठिकाणी राष्ट्रवादीला काँग्रेससोबत बसण्याशिवाय गत्यंतर नाही. अशा स्थितीत स्वपक्षातील इच्छुकांची गच्छंती करून दुसऱ्या पक्षातील गटाला संधी देण्याचे औदार्य दाखविले जाण्याची शक्यता आहे. घाटंजी, यवतमाळ, वणी येथे सभापतीपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. घाटंजीमध्ये काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत आहे. ना.शिवाजीराव मोघे आणि त्यांच्या विरोधातील काँग्रेसचा गट यांच्यात स्पर्धा आहे. यवतमाळात १४ पैकी सहाच सदस्य काँग्रेसचे, पाच राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन, मनसे एक सदस्य आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी-शिवसेनेने आघाडी करून सत्ता स्थापन केली. विधानसभा निवडणूक असल्याने येथे विरोधातील काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. ऐन वेळेवर कोणता पक्ष संख्याबळ जुळविण्यात यशस्वी होतो, यावरच सभापतीपदाचे गणित आहे. वणीमध्ये शिवसेनेकडे चार सदस्य आहे. काँग्रेस, भाजप, मनसे, बसपा यांच्याकडे प्रत्येकी एक सदस्य आहे. येथे पुन्हा शिवसेनेची सत्ता स्थापन होण्याची चिन्हे आहे. महागाव, आर्णी, बाभूळगाव, कळंब येथे सर्वसाधारण महिला आरक्षण आहे. महागावमध्ये राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत आहे. अशीच स्थिती आर्णीत असून येथे काँग्रेस स्पष्ट बहुमतात आहे. बाभूळगावमध्ये काँग्रेसचे तीन सदस्य, भाजप दोन आणि राष्ट्रवादी एक अशी स्थिती आहे.
पंचायत समिती सभापतीच्या राजकीय घडामोडींना वेग
By admin | Updated: August 31, 2014 00:06 IST