शेतकरी संपावर : दुधाचा टँकर ओतला रस्त्यावर, भाजीपाला, टरबूज फेकले, १२ शेतकऱ्यांना अटक लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपाचे तीव्र पडसाद जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी उमटले. संतप्त शेतकऱ्यांनी दुधाचे टँकर आणि वाहन अडवून रस्त्यावर दूध ओतले, तर भाजीपाला रस्त्यावर फेकला. नेर, मरसूळ फाटा आणि धनोडा येथे रस्त्यावर अक्षरश: दुधाचे पाट वाहताना दिसत होते. संतप्त शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध प्रचंड घोषणा बाजी करीत मागण्या मान्य होईपर्यंत संपावर ठाम राहण्याचा निर्धार केला. नेर येथे युवा संघर्ष समितीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कारंजा मार्गावर शुक्रवारी सकाळी दुधाचा टँकर अडविला. टँकरचा वॉल तोडून त्यातील शेकडो लीटर दुधाने चक्क रस्त्याचाच अभिषेक केला. नंतर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेला. गेल्या तीन वर्षांपासूनची नापिकी आणि सरकारी अनास्थेमुळे शेतकरी संकटात सापडल्याचा आरोप त्यांनी केला. तुरीचे चुकारे त्वरित द्या, घोषित केल्याप्रमाणे सोयाबीनला प्रती क्विंटल २०० रूपयांचे अनुदान द्या, तूर खरेदी सुरू ठेवा, स्वामीनाथन आयोग लागू करा, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, आदी घोषणा देत धडक मोर्चा तहसीलवर धडकला. तेथे तहसीलदारांना निवेदन दिले. मोर्चाला युवा संघर्ष समितीचे संतोष अरसोड, उमेश गोळे, गुलाब राठोड, मनोहर देशमुख, गोपाल चव्हाण आदींनी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या कथन केल्या. शेतकऱ्यांच्या समस्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. या मोर्चात निखील जैत, नूर खाँ पठाण, विजय राठोड, मुकुंद गावंडे, जगदीश भगत, सदानंद पेचे, दिनेश चौधरी, श्रीकांत ठाकरे, गौरव नाईकर आदींसह तालुक्यात शेतकरी सहभागी होते. परत जाताना मोर्चेकऱ्यांनी ट्रकमधील टरबूजे रस्त्यावर फेकली. रस्त्यावर टरबुजांचा सडा पडला होता. यामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. मोर्चेकरी २१ शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. शेतकऱ्यांच्या ‘मी संपावर जातोय’ या आंदोलनाला नेर तालुक्यातील कृषी केंद्र चालकांनीही पाठींबा दिला. सर्व कृषी केंद्रे शुक्रवारी बंद होती. महागाव येथे आठवडीबाजारात शेतकऱ्यांनी माल विक्रीवर बहिष्कार टाकून टमाटे, पालेभाज्या रस्त्यावर फेकून देत शासनाचा निषेध केला. महागाव तालुक्यातील हिवरा येथे नागपूर-तुळजापूर या महामार्गावर दूध व भाजीपाला रस्त्यावर फेकला. धनोडा येथे दुधाचे वाहन अडवून कॅनमधील दूध रस्त्यावर ओतले. उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मरसूळ फाट्यावर आंदोलन केले. सकाळी पुसदकडे दूध घेऊन जाणारे वाहन मरसूळ फाट्यावर अडवून दूध रस्त्यावर ओतले. शेतकऱ्यांनी पुसद, उमरखेड, ढाणकी येथे भाजीपाला विक्रीस न नेता रस्त्यावर फेकून शासनाप्रती प्रचंड रोष व्यक्त केला. या प्रकरणी पोलिसांनी १८ जणांवर गुन्हा दाखल करून १२ जणांना अटक केली आहे. कॉग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीचा पाठिंबा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संपाला काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीसह विविध संघटनांनी पाठींबा दिला. शेतकऱ्यांच्या मागण्या न्याय आणि रास्त असून बळीराजाला न्याय मिळायलाच हवा, अशी भूमिका या पक्षांनी घेतली. विशेष यातील शिवसेना हा पक्ष राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सहभागी आहे. शिवसेनेने आधीपासूनच कर्जमुक्तीची मागणी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही राज्यात संघर्ष यात्रा काढून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी लावून धरली. आता खुद्द बळीराजाच रस्त्यावर उतरला. त्यामुळे सरकार पेचात सापडले आहे. दूध वाहतुकीसाठी पोलीस संरक्षणाची मागणी यवतमाळ जिल्ह््यात शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान टँकर आणि वाहनातील दूध रस्त्यावर ओतून आपला रोष व्यक्त केला. यामुळे दूध वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहे. दूध वाहतुकीसाठी पोलीस संरक्षणाची मागणी अमूल कंपनीच्या व्यवस्थापकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दूध वाहतुकीला पोलीस संरक्षण देण्याचे मान्य केले असून त्यामुळे शनिवारपासून दुधाची वाहतूक पोलीस संरक्षणात होण्याची शक्यता आहे. यवतमाळची बाजारपेठ ठप्प इतर जिल्ह्यातून येथील भाजी मंडीत येणाऱ्या शेतमालाची आवक थांबली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भरणाऱ्या बाजारातही शेतकऱ्यांनी भाजी आणलीच नाही. येथील शासकीय दूध संकलन केंद्राने ९४६ लिटर दुधाचे संकलन केले. हे दूध अमरावतीकडे जात असताना नेरमध्ये शेतकऱ्यांनी वाहनाला अडवून दूध रस्त्यावर सोडले. जिल्ह्यात अमूल, रानडे, नमस्कार, अमृतधारा, दिनशा, आरे, सत्कारसह विविध खासगी दूध संकलन केंद्रांच्या डेअरी आहे. त्यांच्या दूध संकलनात पहिल्या दिवशी १० टक्के, शुक्रवारी दुसऱ्या दिवशी ३० टक्के घट आली. कामठवाडा येथे चाणी, चिकणी व लिंगा येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत बसस्थानकाजवळ दिवसभर धरणे दिले. यात शेतमजुरही सहभागी होते.
नेर, महागाव, उमरखेडमध्ये उद्रेक
By admin | Updated: June 3, 2017 00:42 IST