दारव्हा : जिल्ह्यातील ३७२ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. ही सर्व गावे विकासाच्या बाबतीत परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने कामे करावयाची आहे. त्यामुळे या योजनेशी संबंधीत यंत्रणेसोबतच विविध विभागांनीही या गावांमध्ये विकासाची कामे राबवून आपला सहभाग देणे आवश्यक आहे. त्यासाठी या विभागांनी विकासाचा आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या.पालकमंत्र्यांनी दारव्हा तालुक्यातील विविध विकास कामे, जलयुक्त शिवार योजना व तालुक्यातील तलाठी कार्यालयाच्या बांधकामाचा आढावा दारव्हा येथील बचत भवन येथे आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य पंढरी सिंहे, संगीता इंगोले, पंचायत समिती सभापती उज्वला बनसोड, उपसभापती प्रा.सुषमा गावंडे, सदस्य चरण पवार, जयश्री मिराशे, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड उपस्थित होते.जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या गावांमध्ये जलसंधारण, पाणलोटची कामे करून या गावांमधील पाणी टंचाई कायमस्वरूपी निकाली काढायची आहे. त्यादृष्टीने संबंधीत यंत्रणा काम करीत आहे. परंतु एवढयावरच न थांबता ही गावे विकासाच्या दृष्टीने परिपूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे या गावांमध्ये पांदण रस्ते, पक्के रस्ते, इमारत बांधकाम, वृक्ष लागवड, विजेच्या समस्या, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा यांसह विविध प्रकारची कामेही करावयाची आहे. त्यामुळे निवडण्यात आलेल्या गावांमध्ये विकास कामे करण्यासाठी प्रत्येक विभागाने आठ दिवसात विकास आराखडा सादर करावा व कामे करावी, असे पालकमंत्र्यानी सांगितले. या कामांसाठी विभागांतर्गत असलेल्या निधीचा उपयोग करावा. निधी उपलब्ध नसल्यास मागणी करावी, असेही त्यांनी सांगितले.गावांमध्ये विकासाची कामे करीत असतांना गावकऱ्यांना विश्वासात घ्या. जलशिवार योजनेअंतर्गत कामांचे मूल्यमापन होणार असल्याने काळजीपूर्वक कामे केली जावी, असेही त्यांनी सुचविले. जिल्ह्यातील या योजनेतील गावे राज्यासाठी मार्गदर्शक ठरतील अशा पद्धतीने गावांमध्ये कामे करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या योजनेंतर्गत दारव्हा तालुक्यातील ४६ गावांमध्ये कामे केली जात असून यावेळी या सर्व गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते. या सर्व गावातील विकास आराखडे करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित सरपंचांसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी तालुक्यातील तलाठी कार्यालयाच्या बांधकामाचा आढावाही त्यांनी घेतला. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी उपस्थित ४६ गावांचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांना मार्गदर्शन केले. (तालुका प्रतिनिधी)
जलयुक्त शिवार योजनेत इतर विभागांचाही सहभाग महत्त्वाचा
By admin | Updated: February 11, 2015 00:09 IST