नागरिकांचे निवेदन : परवानगी नाकारण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने येथील गांधी चौकात बिअरबार व वाईनबारला परवानगी देवू नये, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि नगराध्यक्षांना निवेदन सादर करण्यात आले. शहाडे संकुलमध्ये बिअरबार सुरू होत असल्याची माहिती मिळाली. हा परिसर वर्दळीचा आहे. विविध प्रकारची व्यावसायिक प्रतिष्ठाने, धार्मिक स्थळे या भागात आहेत. शिकवणी वर्ग, चित्रपटगृह, रुग्णालय असल्याने सतत गर्दी राहाते. उत्सव काळात तर जिल्हाभरातील नागरिक या परिसरात येतात. काही भाग संवेदनशील आहे. भविष्यातील धोके टाळण्यासाठी बिअरबार व वाईनबारला परवानगी देवू नये, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना प्रामुख्याने अमन निर्बाण, अरविंद देशमुख, रामचंद्र जिरापुरे, सुनील तोडे, योगेश शिरभाते, प्रवीण रेड्डी, रवींद्र पेंडले, प्रफुल्ल लष्करी, मंगेश भानारकर, योगेश शर्मा, संदीप गुजर, सुनील राऊत यांच्यासह या भागातील नागरिकांची उपस्थिती होती.
गांधी चौकात बिअरबारला विरोध
By admin | Updated: June 11, 2017 00:20 IST