यवतमाळ : पीक विम्याच्या मदतीकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांची विमा कंपन्यांनी चक्क दिशाभूल केली आहे. बँकांमध्ये लागलेल्या यादीत अनेक शेतकऱ्यांच्या नावासमोर मदतीचे केवळ १३६ रुपये आहे. हा धक्कादायक प्रकार पाहून शेतकरी संतप्त झाले असून अनेकांनी पीक विम्याची मदत शासनाला परत करण्याची तयारी चालविली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी पीक विमा उतरविला होता. या मोबदल्यात कंपनीने पिकाच्या संरक्षणाची हमी दिली होती. जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टी झाली. प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे विमा कंपन्यांनी जिल्ह्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना ३४ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वळतीच केली नव्हती. १० सप्टेंबर रोजी पीक विमा कंपनीने मदतीची पहिली यादी जाहीर केली आणि शेतकऱ्यांना जबर धक्का बसला. या यादीत हेक्टरी ५०० रुपये हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ १३६ रुपये मंजूर करण्यात आले आहे. जाहीर झालेली ही मदत शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे. जिल्ह्यात ८६ हजार शेतकऱ्यांना ३० कोटी रुपये देण्यात आले. १३६ रुपये मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत लागलेल्या याद्या पाहण्यासाठी शेतकरी येत आहे. मात्र मदतीचा आकडा पाहून गावी जाण्यायेण्याची तिकीटही निघत नसल्याचे दिसत आहे.(शहर वार्ताहर)
पीक विम्याची मदत केवळ १३६ रुपये !
By admin | Updated: September 18, 2014 00:07 IST