दिग्रस : बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, उद्योजकांना आकर्षित करता यावे, यासाठी दिग्रस येथे एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. मात्र याठिकाणी गेल्या कित्येक वर्षात एकही उद्योग उभारता आला नाही. एमआयडीसीचा फलक बेरोजगारांना मात्र वाकुल्या दाखवित उभा आहे. दिग्रस हा आदिवासी बहुल तालुका आहे. या तालुक्यात शेतमजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोणताही उद्योग नसल्यामुळे तरुणांच्या हातालाही काम मिळत नाही. येथे असलेले कापसावरील प्रक्रिया उद्योगही बंद पडले आहेत. तसेच खादी ग्रामोद्योगचा असलेला उद्योगही कायमचा बंद आहे. यामुळे तरुणांना रोजगारासाठी मोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागते. तरुणांना तालुक्याच्या ठिकाणीच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी दिग्रस येथे एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. आर्णी मार्गावर जमीन अधिग्रहित करण्यात आली. एमआयडीसीने मोठा फलकही लावला. मात्र एकही उद्योजक या एमआयडीसीत उद्योग उभा करण्याची हिंमत करीत नाही. त्याला कारणही तसेच आहे. एमआयडीसीत कोणत्याही सुविधा नाही. परिसराला झुडुपी वनस्पतीने व्यापले आहे. वीज, पाणी आणि रस्त्याचीही सुविधा नाही. त्यामुळे कुणी येथे उद्योग उभारण्यास तयार नाही. (प्रतिनिधी)
दिग्रस एमआयडीसीत उद्योगांचीच वाणवा
By admin | Updated: April 30, 2016 02:41 IST