पुसद : मागील पावसाळ््यात झालेला अत्यल्प पाऊस आणि यावर्षीचा तीव्र उन्हाळा यामुळे तालुक्यातील भूजल पातळी चांगलीच खालावली आहे. वनराईच्या पायथ्याची तालुक्याच्या पश्चिमेकडे असलेल्या व पुसद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पूस धरणात सध्या केवळ १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पाऊस लांबणीवर पडल्यास पुसदकरांना पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या भेडसाऊ शकते. पुसद येथून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या वनराईच्या पायथ्याशी माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टिकोणातून पूस धरण तयार करण्यात आले. हे धरण तेव्हापासून पुसदकरांसाठी जीवनदायी ठरले आहे. पुसद तालुक्यात इसापूर व पूस ही दोन मोठी धरणे आहेत. पूस धरण हे पूस नदीवर तर इसापूर धरण हे पैनगंगा नदीवर आहे. मागील तीन वर्षाच्या पाण्याच्या सरासरीवर नजर टाकल्यास यावर्षी पुसद धरणाचा ३ जून रोजीचा जलसाठा १२.६९ टक्के एवढा कमी आहे. २०१३ मध्ये ३ जून रोजी या धरणात ३१.०६ टक्के व २०१४ च्या ३ जून रोजी २३.७६ टक्के जलसाठा होता. सध्या पुसद नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती व नगरपरिषद प्रशासनाच्या नियोजनामुळे पुसदकरांना धरणात जलसाठा कमी होत असतानाही नियमित पाणीपुरवठा होत आहे. पाऊस लांबणीवर गेल्यास पुसदकरांना एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येऊ शकते. मागील वर्षी १४ जून रोजी धरण परिसरात चांगला पाऊस झाला होता. एकूण ४८ मिलीमिटर एवढा पाऊस नोंदविण्यात आला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अंदमानमध्ये साधारणत: २० मे रोजी मान्सून दाखल होतो. यंदा मान्सूनने तेथे वेळेपूर्वीच १६ मे रोजी हजेरी लावली आहे. त्यानंतर मात्र तब्बल पाच दिवसांनी पुढील वाटचाल सुरू झाली. परंतु अजूनही तो केरळपर्यंतच पोहोचलेला नाही. त्यामुळे राज्यात यंदाही जून महिना कोरडा जाण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे खरिपाचा हंगाम धोक्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
पूस धरणात केवळ १२ टक्के जलसाठा
By admin | Updated: June 4, 2015 02:14 IST