यवतमाळ : बाजारपेठेत टंचाईसदृश स्थिती निर्माण झाल्याने राज्य शासनाने २०१० च्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये डाळीसोबत तेलबिया साठवणुकीचे निकष देण्यात आले आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. यामध्ये तेलबिया साठवणुकीसाठी ३०० क्विंटलची मुुभा आहे. सोयाबीन खरेदी हंगामात लागलेले निकष व्यापाऱ्यांना परवडणारे नाही. या गोंधळाच्या स्थितीत सोयाबीनचे दर मात्र क्विंटलमागे ३०० रूपयांनी घटले. व्यापारी आणि शासनाच्या भांडणात शेतकऱ्यांना जबर नुकसान सोसावे लागत आहे. सध्याचे शेतमालाचे दर शेतकऱ्यांना परवडणारे नाही. यामुळे शेतकऱ्यांची दरवाढीची मागणी होती. प्रत्यक्षात साठेबाजीच्या आदेशाने व्यापाऱ्यांनी सोयाबीन खरेदीतून हात आवरता घेतला आहे. परिणामी सोयाबीनचे दर ३९०० रूपये क्विंटलवरून ३७२० रूपयांपर्यंत घसरले. तब्बल २०० रूपयांची घसरण झाली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.हर्रास थांबल्याने तणावराज्य शासनाच्या नवीन आदेशाने व्यापाऱ्यांना तेलबियाची साठवणूक करता येणार नाही. हंगामात प्रत्येक बाजारपेठेत मोठी आवक राहणार आहे. अशा स्थितीत सरकारच्या धोरणाने खरेदीवर बंधन येणार आहे. मग इतर शेतकऱ्यांचा माल खरेदी कोण करणार यासंदर्भात शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी व्यापारी करीत होेते. या प्रकरणात प्रशासकाच्या मध्यस्थीनंतर पुन्हा लिलाव सुरू झाला. यामुळे तणाव निवळला. या प्रकरणात व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे अडचणी मांडल्या आणि धान्य खरेदीतील अडथळा दूर करण्याची मागणी केली. यासंदर्भातील निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर केले. (शहर वार्ताहर)
तेलबिया साठवणूक आदेशाने गोंधळाची स्थिती
By admin | Updated: October 27, 2015 02:53 IST