एसडीओ निमा अरोरा यांची माहिती : पहिल्याच दिवशी आर्णी रोडवरील ३५ दुकाने उद्ध्वस्तयवतमाळ : शहर व परिसरातील अतिक्रमण हटविणे, हटविलेले अतिक्रमण पुन्हा बसू नये, यावर आता प्रशासनाचा पूर्णवेळ वॉच राहणार आहे. त्यासाठी प्रत्येक आठवड्याच्या गुरुवार आणि शुक्रवारी नियमित अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाणार आहे. दरम्यान गुरुवार १२ मेपासून या मोहिमेला प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी बसस्थानक ते आर्णी रोड या मार्गावरील तब्बल ३५ दुकानांचे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने हटविले गेले. या मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांची चांगलीच दाणादाण उडाली. यवतमाळच्या उपविभागीय महसूल अधिकारी निमा अरोरा (आयएएस) यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत ‘लोकमत’ला माहिती दिली. त्यांची नेरवरून यवतमाळ एसडीओपदी नियुक्ती झाल्यापासूनच अतिक्रमणधारकांनी त्यांची धास्ती घेतली होती. अपेक्षेनुसार त्यांनी शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेचे वेळापत्रकच तयार केले. आता दर आठवड्यात दोन दिवस ही मोहीम राबविली जाणार आहे. त्यामुळे पुन्हा अतिक्रमण होण्याची शक्यता कमीच आहे. ते झाले तरी तत्काळ उचलले जाणार आहे. गुरुवारपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आर्णी रोडवरील वीज वितरण कंपनी कार्यालयाच्या भिंतीला लागून असलेले अतिक्रमण हटविले गेले. वीज वितरण कार्यालयाच्या चहूबाजूने असलेले अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले. त्यात ३५ दुकाने उचलण्यात आली. नगरपरिषद आणि महसूल विभागाच्या पुढाकाराने ही मोहीम राबविली गेली. त्यात संबंधित अन्य विभागांनीही सहभाग घेतला. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. (शहर वार्ताहर) नाल्यांनी घेतला मोकळा श्वास अतिक्रमणधारकांनी मुख्य मार्गावरील नाल्या बुजवून तर कुठे त्यावर रपटे टाकून आपले दुकान थाटले होते. मोहिमेमुळे अतिक्रमण तर हटलेच, शिवाय नाल्याही मोकळ्या केल्या गेल्या. त्यातील गाळ उपसला गेला. पावसाळ्याच्या तोंडावर नाल्या मोकळ्या झाल्याने दुकान, घरे, कार्यालयात पाणी शिरण्याचा धोका कमी झाला.
आता दर आठवड्यात अतिक्रमण हटाव
By admin | Updated: May 13, 2016 02:33 IST