संवेदनशील क्षेत्र वाढले : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आव्हान यवतमाळ : यवतमाळ जिल्हा पोलीस दलाला लवकरच राज्यसेवेऐवजी अखिल भारतीय पोलीस सेवेतील अपर पोलीस अधीक्षक मिळणार आहे. जिल्ह्यात संवेदनशील गावांची वाढती संख्या लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने गृहविभागाकडून हे पाऊल उचलले जात आहे. यवतमाळ हा भौगोलिक दृष्ट्या विदर्भातील सर्वात मोठा जिल्हा आहे. येथे १६ तालुके आहेत. जिल्ह्याच्या दोन टोकाचे अंतर सुमारे साडेतीनशे किलोमीटर पेक्षा अधिक आहे. राज्याच्या राजकारणात यवतमाळ जिल्ह्याचे वेगळे महत्व आहे. सध्या यवतमाळ जिल्हा पोलीस दलाची कमांड भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) अधिकाऱ्याकडे आहे. तर राज्य सेवेतील अधिकाऱ्याकडे अपर पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी दिली जाते. परंतु जिल्ह्यातील वाढती संवेदनशीलता लक्षात घेता यापुढे अपर पोलीस अधीक्षक पदावरसुद्धा आयपीएस अधिकारी देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे. यापूर्वी ब्रिजेशसिंग, अब्दूर रहमान हे आयपीएस अधिकारी अपर पोलीस अधीक्षक राहिलेले आहेत. परंतु आता नियमितच आयपीएस ‘अॅडिशनल एसपी’ देण्याचा विचार शासनस्तरावर सुरू आहे. यंदाच्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये हा बदल यवतमाळ जिल्ह्यात पहायला मिळणार आहे. जिल्ह्याला लागूनच असलेली तेलंगणा राज्य, मराठवाड्याच्या सीमा, महामार्गावरून चालणारी तस्करी, गुन्हेगारी टोळ्या, हैदराबाद कनेक्शनमधून होणारी शस्त्रांची तस्करी, जातीय तेढ वाढविणाऱ्या घटना, सण-उत्सव काळात शांततेला आव्हान दिल्यामुळे पोलीस रेकॉर्डवर अतिसंवेदनशील म्हणून अनेक गावांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवरच आयपीएस अपर अधीक्षक देण्याचा निर्णय घेतला जात असल्याची माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी) पुसद, उमरखेडसाठी स्वतंत्र प्रस्ताव - सिंहस्वतंत्र जिल्ह्याच्या वाटेवर असलेल्या पुसदसाठी अपर पोलीस अधीक्षकाचे स्वतंत्र पद निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर झाला आहे. शिवाय नऊ पोलीस ठाण्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या उमरखेड विभागासाठी स्वतंत्र पोलीस उपअधीक्षक देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा पोलीस दलातर्फे शासनाकडे प्रस्तावाद्वारे करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी ‘लोकमत’ला दिली.
आता आयपीएस ‘अॅडिशनल’ एसपी
By admin | Updated: April 14, 2016 02:02 IST