अतिक्रमण जैसे थे : सामान्य नागरिकांना पुन्हा मोहिमेची प्रतीक्षा यवतमाळ : भारतीय प्रशासकीय सेवेच्या परिविक्षाधीन अधिकारी निमा अरोरा या यवतमाळच्या एसडीओ म्हणून रुजू झाल्याने शहरातील अतिक्रमणधारकांना पुन्हा धडकी भरली आहे. थेट आयएएस असलेल्या निमा अरोरा काही महिन्यांपूर्वी यवतमाळ नगर परिषदेच्या मुख्याधिकारी होत्या. या काळात त्यांनी शहरातील अतिक्रमण भूईसपाट केले. मात्र त्या येथून नेरच्या तहसीलदारपदी जाताच यवतमाळ शहरातील अतिक्रमण जैसे थे झाले आहे. आता तर मूळ अतिक्रमणधारकांशिवाय गजबजलेल्या चौकाचौकांमध्ये आणखी रस्त्यावर अतिक्रमण थाटले जात आहे. या अतिक्रमणधारकांनी आता पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होण्याचा धसका घेतला आहे. कारण अतिक्रमणांचा कर्दनकाळ ठरलेल्या निमा अरोरा पुन्हा यवतमाळात दाखल झाल्या आहेत. उपविभागीय महसूल अधिकारी पदावर त्या कार्यरत राहणार आहे. त्यामुळे त्यांनी यवतमाळ शहरात पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्याची सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी) आर्णी रोडवरील पोलीस चौकीचा उपयोग काय ?यवतमाळ ते आर्णी रोडवर वडगाव रोड पोलिसांची चौकी आहे. आर्णी नाक्यावर असलेल्या या चौकीचा खरोखरच उपयोग काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण या चौकीत नागरिकांना पोलीस कर्मचारी बहुतांश दृष्टीस पडत नाही. या चौकीच्या अगदी समोर सकाळी व सायंकाळी हॉकर्स-फेरीवाल्यांची प्रचंड गर्दी राहते. या मार्गावर पायी चालणेही कठीण होते. अशा स्थितीत विक्रेत्यांच्या गाड्या रस्त्यावर राहत असल्याने खरेदीदार त्यांच्यासमोर आपले वाहन उभे करून खरेदी करतो. रस्त्याच्या दोनही बाजूला ही स्थिती असल्याने आर्णी नाक्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. वास्तविक या नाक्यावर वाहतूक पोलिसांची सकाळ-सायंकाळ ड्युटी अपेक्षित आहे. मात्र तेथे वाहतूक पोलीस व्हीआयपींच्या दौऱ्याच्या वेळीच तेवढा दृष्टीस पडतो. पोलीस चौकीसमोर वाहतुकीची कोंडी होऊनही ती फोडण्यासाठी तेथे कधी पोलीस दिसत नाही आणि चुकून हजर असला तरी हा पोलीस कधी कोंडी फोडण्यासाठी स्वत:हून पुढे येत नाही. या चौकीजवळच आर्णीकडून येणाऱ्या एसटी बसचाही थांबा असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. हनुमान मंदिरात येणाऱ्या भाविकांनाही तारेवरची कसरत करून मंदिरात शिरावे लागते. भरचौकात कांदे-फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण कुठे कांदे विक्रेते तर कुठे मसाला विक्रेते, फळ विक्रेते चौकांमध्ये अगदी वळणाच्या रस्त्यावर बसलेले दिसतात. वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून हे अतिक्रमणधारक पैसा कमवित आहे. त्यांच्या या अतिक्रमणामुळे दिवसभर वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यातून मोठे अपघातही होण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र या अतिक्रमणधारकांना कुणाचीच भीती उरलेली नाही. वाहतूक पोलिसांना तर ते जुमानतही नाही. उलट त्यांची ‘आम्ही काय पर्मनंट बसणार आहोत काय’ अशा शब्दात वाहनधारक व सामान्य नागरिकांशी दादागिरी वाढली आहे.
निमा अरोरांच्या आगमनाने अतिक्रमणधारक धास्तावले
By admin | Updated: April 23, 2016 02:36 IST