शहरावर पाणी संकट : १० दशलक्ष लिटर पाणी रस्त्यावर यवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पाची मुख्य पाईपलाईन रविवारी सकाळ फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले. परिणामी यवतमाळ शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढवले असून अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. जीवन प्राधिकरणाने दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पाने तळ गाठला आहे. या प्रकल्पाच्या मृत साठ्यातून पाण्याचा उपसा सुरू आहे. निळोणा प्रकल्प ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत असलेली पाईपलाईन मिश्रा यांच्या शेताजवळ रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास फुटली. यामधून सुमारे दहा दशलक्ष लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. त्यामुळे यवतमाळ शहरावर पाणी संकट ओढवले. रविवारी ज्या भागाला पाणी पुरवठा होणार होता तेथे पाणीच पोहोचले नाही. याचा फटका पाटीपुरा, मेनलाईन, कळंब चौक, आरटीओ आॅफीस परिसर, सुराणा ले-आऊट, राजारामनगर, अलकबीर नगर, विदर्भ हाऊसिंग सोसायटी, जामनकनगर आदी भागाला बसला. यवतमाळ शहरात यावर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. नागरिक पाण्याचा थेंबन्थेंब वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. तीन ते चार दिवसाआड नळाचे पाणी मिळत आहे. तेही अपुरे आहे. आता तर पाईपलाईन फुटल्याने अर्ध्या यवतमाळात पाणी संकट निर्माण झाले आहे. मुख्य पाईपचा शिशाचा जोड तुटल्याने ही पाईपलाईन फुटल्याचे सांगण्यात आले. जीवन प्राधिकरणाचे अधिकारी युद्ध पातळीवर दुरुस्तीच्या कामाला लागले आहे. (शहर वार्ताहर) १९७२ ची पाईपलाईन निळोणा प्रकल्पावरून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत येणारी पाईपलाईन १९७२ सालाची आहे. ही पाईपलाईन आता ठिसूळ झाली आहे. त्यामुळे वारंवार पाईपलाईनवर बिघाड निर्माण होतो. गत दोन वर्षापूर्वीही अशीच पाईपलाईन फुटली होती. त्यामुळे शहरात भीषण पाणीटंचाई उद्भवली होती. आता पुन्हा ही पाईपलाईन फुटली आहे. दुरुस्तीचे काम सुरू असले तरी नेमका पाणीपुरवठा सुरळीत कधी होईल, हे सांगणे कठीण आहे.
निळोणाची मुख्य जलवाहिनी फुटली
By admin | Updated: May 16, 2016 02:34 IST