बाजारपेठ बंद : आरोपींवर कठोर कारवाईची मागणीनेर : शहरात काही दिवसांपूर्वी एका शाळकरी मुलीचे अपहरण करून आजंती शिवारात अतिप्रसंग करण्यात आला होता. या घटनेमुळे तालुकाभरात संतापाची लाट उसळली आहे. घटनेतील एक आरोपी अजूनही फरार आहे. या घटनेचा निषेध म्हणून गुरुवारी सर्वपक्षीय हजारो नागरिकांचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. बाजारपेठही कडकडीत बंद ठेवण्यात आली.नेर शहरातील अशोकनगरातील रहिवासी व शिवाजी हायस्कूलची नवव्या वर्गाची विद्यार्थिनी शाळेतून घरी परत येत असताना चार आरोपींनी तिचे अपहरण केले. नंतर तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. नेर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून तालुक्यात भीतीचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी शाळकरी मुलींना संरक्षण देण्यासाठी कठोर पावले उचलावी, घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, सदर प्रकरण शिघ्रगती न्यायालयात चालवून सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, उर्वरित आरोपीस त्वरित अटक करावी, पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, घरातील एका व्यक्तीस नोकरीत सामावून घ्यावे अशा मागण्या या मोर्चात करण्यात आल्या. मोर्चेकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यानंतर निषेध सभा झाली. सभेत विविध मान्यवरांनी या घटनेचा निषेध करून कठोर कारवाईची मागणी केली.मोर्चाचे नेतृत्व रिपाइंचे जिल्हाध्यक्ष मोहन भोयर यांनी केले. यावेळी नामदेव खोब्रागडे, प्रा. नाजूक धांदे, भाऊराव गायकवाड, डॉ. भीमराव राठोड, इस्माईल आजाद, डी. जे. खडसे, सुधाकर भोयर, वंदना मिसळे, वनिता मिसळे, राजू मेश्राम, अशोक फुलझेले, राहुल तायडे यासह असंख्य महिला-पुरुषांची मोर्चात उपस्थिती होती. दरम्यान, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी मोर्चात हजेरी लावली. मुस्लीम युथ संघटनेचाही या मोर्चात सहभाग होता. (तालुका प्रतिनिधी)
नेर तहसीलवर सर्वपक्षीय मोर्चा
By admin | Updated: July 10, 2015 02:25 IST