यवतमाळ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांची काँग्रेस मध्येच काय इतर कुठेही किमंत नाही. त्यांना स्वत:चे तिकीट आणता येत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. त्यांनी एकदा तरी यवतमाळ अथवा दिग्रस मधून विधानसभा लढवावी, यवतमाळात काँग्रेससोबतच्या मैत्रीपूर्ण लढतीसाठी राष्ट्रवादी केव्हाही तयार आहे, असे आव्हान येथे आयोजित पत्रपरिषदेत राष्ट्रवादीचे नेते आमदार संदीप बाजोरिया यांनी दिले आहे. दिग्रस मतदार संघात प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांचे काहीच वजन नाही. म्हणूनच त्यांनी आपला परपंरागत मतदार संघ सोडून दिला आहे. येथे काँग्रेसचे दोन माजी मंत्री असूनही कोणीच शिवसेने विरोधात लढण्यास तयार नाही. प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या गावची ग्रामपंचायतही वाचविता आली नाही. त्यामुळे येथे डाळ शिजणार नाही हे त्याच्या लक्षात आले आहे. माणिकराव ठाकरे यांनी दिलेला शब्द कधीच पाळला नाही. यवतमाळ नगराध्यक्ष निवडीतही त्यांनी राष्ट्रवादीला मदत करण्याचा शब्द दिला होता. प्रत्यक्षात मात्र काँग्रेसचा उमेदवार उतरविण्यासाठी धडपड केली. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला सत्तेत राहूनही विरोधकाप्रमाणे संघर्ष करावा लागला. काँग्रेसच्या मंत्र्यानी नेहमीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांना त्याची जागा दाखविण्याचे काम जिल्ह्यात राष्ट्रवादी करणार आहे. राज्य पातळीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होणार आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यात याची स्थिती वेगळी राहणार आहे. जिल्ह्यातील घाटाच्यावर म्हणजेच यवतमाळात राष्ट्रवादीची भूमिका पूर्णत: वेगळी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसला जागा दाखविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना राष्ट्रवादीचे आव्हान
By admin | Updated: September 6, 2014 02:22 IST