लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : इको सेन्सेटिव्ह झोनचा बाऊ करत किनवट शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची रूंदी ३० मीटरवरून १८ मीटर करण्यात आली. या प्रश्नावर पुन्हा बैठक लावण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून करण्यात आली आहे. नांदेड-भोकर-हिमायतनगर-किनवट-माहूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र.१६१-ए किनवट शहरातून जात आहे. पैनगंगा अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्र असल्याचे सांगत शिवाय तशी तक्रार करत किनवटच्या जिजामाता चौक ते अशोक स्तंभ या केवळ २०० मीटर कामासाठी राष्ट्रीय महामार्गाची रूंदी १२ मीटरने कमी करण्यात आली. ही बाब माजी आमदार प्रदीप नाईक यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे व पुसदचे उपवनसंरक्षक अशोक सोनकुसरे यांना निवेदन देऊन निदर्शनास आणून दिली.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निवेदन स्वीकारून प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष साजिद खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड, शिवसेनेचे व्यंकट भंडारवार, कचरू जोशी, रोहिदास जाधव आदींची उपस्थिती होती.
काही भागातच कमी केले अंतर, कारण काय?- किनवट शहरातून जाणारा हा मार्ग आयप्पा स्वामी मंदिर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ३० मीटर रूंदीचा होणार आहे. मग जिजामाता चौक ते अशोक स्तंभ हा २०० मीटर लांबीचा रस्ता १८ मीटर रूंदीचा कसा, असा प्रश्न या प्रतिनिधी मंडळाने उपस्थित केला आहे. या मार्गावरील अतिक्रमण धारकांच्या निवेदनावर मंजूर केलेल्या ठरावासंदर्भात पुन्हा योग्य पद्धतीने यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक घ्यावी, अशी मागणी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी केली.