लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील लोहारा येथे बुधवारी दुपारी १.३० वाजता भररस्त्यात युवकाचा गळा चिरुन निर्घृण खून केल्याची घटना घडली. या घटनेने शहरातील गँगवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.देवीदास निरंजन चव्हाण (२५) रा.उद्योगनगर लोहारा असे मृताचे नाव आहे. देवीदासवर भैया यादव याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तो मागील दीड वर्षांपासून कारागृहात होता. महिनाभरापूर्वी त्याची सुटका झाली. या काळात देवीदासचा भाऊ दुर्गेश याने प्रतिस्पर्धी टोळीतील एकाचा देवीनगर प्रवेशद्वाराजवळ खून केला. या गुन्ह्यात तो कारागृहात आहे. देवीदास काही दिवसांपासून एकटाच लोहारा परिसरात राहात होता. विरोधी टोळीच्या सदस्यांवर देवीदासच्या खुनाचा संशय आहे.बुधवारी दुपारी देवीदास दुचाकीने जात असताना वाहनाची धडक देऊन त्याला पाडण्यात आले. नंतर त्याचा गळा चिरण्यात आला. हा घटनाक्रम अगदी काही मिनिटात घडला. त्यामुळे नेमके काय झाले हे कुणाच्याही लक्षात आले नाही. सुरुवातीला अपघात झाला असावा म्हणून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. मात्र गळ्यातून प्रचंड रक्तस्राव होवून देवीदासचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच लोहारा ठाणेदार सचिन लुले, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण घटनास्थळी पोहोचले. याठिकाणी बघ्यांची एकच गर्दी उसळली होती. देवीदासचे मारेकरी नेमके कोण ? याचा शोध घेतला जात आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या चव्हाण बंधूपैकी एकाची जीवनयात्रा रस्त्यावरच संपली. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी देवीदास चव्हाण याने भैया यादव याच्यावर प्राणघातक हल्ला केला त्यावेळी टोळी विरोधी पथकाच्या सतर्कतेमुळे भैया यादवचा प्राण वाचला. त्याच ठिकाणी देवीदासचा खून केला गेला.वर्चस्वाच्या लढाईतून लोहारा परिसरात खुनाचे सत्रयवतमाळ शहरातील खुनाचे सत्र पुन्हा सुरू झाल्याचे चित्र आहे. टोळ्यांमध्ये एकमेकांचा वचपा काढण्यासाठी स्पर्धा लागली आहे. पूर्वी पाटीपुरा, आंबेडकरनगर परिसरात अशा पद्धतीने खुनाचे सत्र सुरू होते. आता गेल्या काही दिवसांपासून लोहारा भागात गुन्हेगार एकमेकाला संपविण्यासाठी झगडत आहेत. भरदिवसा भर रस्त्यात झालेल्या खुनाने लोहारा पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे.
लोहारात भरदिवसा युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:00 IST
बुधवारी दुपारी देवीदास दुचाकीने जात असताना वाहनाची धडक देऊन त्याला पाडण्यात आले. नंतर त्याचा गळा चिरण्यात आला. हा घटनाक्रम अगदी काही मिनिटात घडला. त्यामुळे नेमके काय झाले हे कुणाच्याही लक्षात आले नाही. सुरुवातीला अपघात झाला असावा म्हणून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. मात्र गळ्यातून प्रचंड रक्तस्राव होवून देवीदासचा जागीच मृत्यू झाला.
लोहारात भरदिवसा युवकाचा खून
ठळक मुद्देपूर्ववैमनस्य : महिनाभरापूर्वीच आला होता कारागृहाबाहेर