कार्यक्रम जाहीर : २४ जूनपासून होणार प्रक्रियेला सुरुवात यवतमाळ : जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांची मुदत डिसेंबर महिन्यात संपणार आहे. त्यापूर्वी येथे निवडणूक प्रक्रिया घेण्यासाठी प्रभाग रचना केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला असून १६ आॅगस्टला प्रभाग निश्चित केले जाणार आहे. जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद, दिग्रस, दारव्हा, आर्णी, घाटंजी, वणी, उमरखेड या नगरपरिषदांची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी प्रभाग रचना केली जात आहे. यासाठी २४ जून ते १६ आॅगस्टपर्यंतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या क्षेत्र, सीमांकन, नकाशा, अनुसूचित जाती व जमाती आरक्षणासह प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहे. प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतर ३० जून रोजी सदस्यांच्या आरक्षणाच्या सोडतीची नोटीस जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर प्रभागनिहाय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, नागरिकांचा मागासप्रवर्ग तसेच सर्व साधारण महिला प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत २ जुलै रोजी करण्यात येणार आहे. या प्रारुप प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीवर १४ जुलैपर्यंत आक्षेप घेता येणार आहे. त्यानंतर २७ जुलैला जिल्हाधिकारी स्तरावर आक्षेपांची सुनावणी होणार आहे. २ आॅगस्टला हरकती व सूचनांच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त आणि नगर परिषद संचालकांकडे अहवाल पाठविला जाणार आहे. अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देण्यासाठी १० आॅगस्टला विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव ठेवला जाणार आहे. १६ आॅगस्टला अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे. राजकीय समीकरणही प्रभाग रचना आणि त्यातील आरक्षणावर अवलंबून असल्याने सर्वांचेच लक्ष या प्रभाग रचना प्रक्रियेकडे लागलेले आहे. १५ जूनच्या निर्देशानुसार नगरपरिषद स्तरावर आणि जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी नेमण्यात आले आहे. प्रारुप प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
आॅगस्टमध्ये ठरणार पालिकेचे प्रभाग
By admin | Updated: June 19, 2016 02:14 IST