यवतमाळ : यवतमाळच्या नगराध्यक्षपदी सुभाष राय यांना शहर विकास आघाडीने आरुढ केले. मात्र त्यांच्याकडूनच शहर विकासासंबंधी आघाडीला अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा आरोप गुरुवारी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत केला. शहर विकास आघाडीचे गटनेते तथा नगरपरिषद उपाध्यक्ष मनीष दुबे, प्रा.प्रवीण प्रजापती, सुमीत बाजोरिया, जगदीश वाधवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पत्रपरिषद पार पडली. हे पदाधिकारी म्हणाले, गेल्या वर्षभरात शहरात शहर विकास आघाडीने विविध विकास कामे केली. मात्र महिला सभापतींना या कामांचे मार्केटींग जमले नाही. त्याचा फायदा उठवित नगराध्यक्षांनी एकट्यानेच श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. नगरपरिषदेत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, शिवसेना अशा २७ सदस्यांनी मिळून शहर विकास आघाडी स्थापन केली. या आघाडीच्या माध्यमातून विकास कामे केली जात आहे. आमदार मदन येरावार, संदीप बाजोरिया यांच्या माध्यमातून विविध स्वरूपाचा विकास निधी प्राप्त करून घेतला आहे. चार कोटींचे सिमेंट काँक्रिटीकरण, आर्णी मार्गाच्या रुंदीकरणाची तरतूद केली आहे. आठवडीबाजाराच्या विकासासाठी आराखडा तयार केला जात आहे. शहरात २४ तास सातही दिवस पाणीपुरवठ्यासाठी बेंबळा आणि चापडोह येथून वाढीव पाणीपुरवठा योजना प्रस्तावित केली आहे. येत्या चार महिन्यात नगरपरिषदेची हद्दवाढ होणार असल्याने त्यासाठीही आराखडा तयार केला जात आहे. मुख्याधिकारी आणि नगरपरिषदेतील काही ज्येष्ठ अधिकारी अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करीत असल्याने ते जुमानत नाही. शहरातील काही कामे या अधिकाऱ्यांमुळेच रखडली आहेत. नगरसेवकांना मिळणारी एक नाली व एक रस्ता तब्बल तीन वर्षानंतर मिळाला आहे. सर्वसाधारण सभा बोलविण्याचा अधिकार नगरसेवकांना नसल्याने इतरांच्याच मनमर्जीने विषय सभागृहात ठेवले जातात. अनेक महत्त्वाचे विषय सभेच्या विषयपत्रिकेत जाणिवपूर्वक घेतले जात नाही. सभेत चर्चा करून घेण्यात आलेले ठराव आणि प्रत्यक्षात सभेच्या इतिवृत्त पुस्तिकेत लिहिण्यात आलेले ठराव यात मोठी तफावत असते. नगरसेवकांनी मागणी करूनही मुख्याधिकाऱ्याने बैठकीच्या चित्रीकरणासाठी कॅमेरा आणलाच नाही. मुख्याधिकारी ऐकत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. शहरातील अतिक्रमण, पाणीपुरवठ्यातील अनियमितता या बाबत प्रयत्नरत आहोत. शहरातील सर्वच रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट झाल्याचे मान्य करीत आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यासाठीही नगरपरिषद प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, यवतमाळातील अतिक्रमणधारकांना कंपोस्ट डेपोसाठी आरक्षित असलेल्या १२ एकर जागेवर घरकूल देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. टीबी हॉस्पिटलच्या जागेतही आमदार मदन येरावार व आमदार संदीप बाजोरिया यांच्या प्रयत्नातून व्यापार संकुल प्रस्तावित केले आहे. प्रथमच नगरपरिषदेत सभापती म्हणून चारही महिलांना संधी देण्यात आली. त्यांच्याकडून विकास कामे नियमित होत असली तरी त्याची माहिती पोहोचविली जात नाही, ही उणिव असल्याची खंत सुमीत बाजोरिया यांनी व्यक्त केली. पत्रपरिषदेला सभापती प्रणिता खडसे, मीना मसराम, अरुणा गावंडे, जयदीप सानप, अमोल देशमुख, आनंद जयस्वाल, मोहन देशमुख, दत्ता कुळकर्णी आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)
नगराध्यक्षांचे विकासात सहकार्य मिळत नाही
By admin | Updated: August 14, 2015 02:43 IST