बोलेरो पुलावर आदळली : महिला, मुलांचाही समावेश घाटंजी : घाटंजी येथील वर आणि पांढरकवड्यातील वधू, दोनही परिवारात आनंदाचे वातावरण, सकाळी लग्न सोहळा पार पडला, त्यानंतर दुपारी वधू-वरासह वऱ्हाडी मंडळींची वाहने घाटंजीकडे निघाली. मात्र यातील एक वाहन चालकाचे नियंत्रण सुटून पुलावरील कठड्याला धडकल्याने भीषण अपघात झाला, त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या लग्न प्रसंगातील आनंद सोहळ्यावर विरजण पडले. दोनही परिवार व त्यांचे नातेवाईक शोकसागरात बुडाले. मृतांमध्ये अमीनाबी कदीर अली (६५) रा. आर्णी, हकमुद्दीन शरीफोद्दीन काझी (५०) रा. घोटी, साबेराबी युनुस शेख रा. घाटी, नजमा शेख (७ वर्षे), युसुफ खान (५०), जुबेदाबी अब्दुल शेख (६०) यांचा समावेश आहे. तर वाहनातील अन्य काही प्रवासी जखमी झाले. घाटंजी येथील शेख इरफान अब्दूल शेख यांच्या मुलाचा हा पांढरकवडा येथे विवाह सोहळा होता. (तालुका प्रतिनिधी)
सहा जणांच्या अपघाती मृत्यूने पसरली लग्न सोहळ्यावर शोककळा
By admin | Updated: June 1, 2015 00:24 IST