स्वप्नील कनवाळे - पोफाळी निसर्गाच्या अवकृपेचा सामना करणारा शेतकरी पुरता हतबल झाला असून सध्या पोफाळी परिसरातील सोयाबीनवर मोझॅक तर कपाशीवर लाल्याने आक्रमण केले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती निर्माण झाली असून दररोज तापणाऱ्या उन्हामुळे कीड नियंत्रणही अशक्य होत आहे. पोफाळी परिसरात शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कपाशी आणि सोयाबीनची लागवड केली. सुरुवातीला पावसाने दडी मारली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. या संकटातून शेतकरी सावरत नाही तोच आता किडींनी आक्रमण केले आहे. पोळ्याच्या आठवड्यात झालेल्या पावसाने सोयाबीन आणि कपाशीला दिलासा मिळाला. पिके जोमाने वाढू लागली आहे. अशा स्थितीत सोयाबीनवर मोझॅक या रोगाचे आक्रमण झाले आहे. पाने पिवळी पडून सोयाबीन वाळत आहे. परिसरातील कोणत्याही शेतावर नजर टाकल्यास पिवळे जर्द झालेले सोयाबीनचे शेत दिसून येतात. यामुळे सोयाबीनच्या शेंगा भरण्याची प्रक्रिया मंदावली असून अनेक ठिकाणी तर शेंगांमध्ये दाणेच दिसत नाही. अशीच स्थिती कपाशीचीही झाली आहे. विविध किडींनी आक्रमण केले आहे. मात्र लाल्याच्या आक्रमणाने शेतकरी पुरता हादरला आहे. कृषी विभागही यावर कोणत्याच उपाययोजना सूचविताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहे. सध्या निवडणुकांचा ज्वर चढल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही. अशा स्थितीत संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे.
सोयाबीनवर मोझॅक तर कपाशीवर लाल्या
By admin | Updated: September 25, 2014 23:36 IST