प्रकाश सातघरे ल्ल दिग्रस दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचेमुळे तालुक्यातील पशुधनाच्या विक्रीत वाढ झाली असून याचा प्रत्यय शनिवारी भरलेल्या येथील बैलबाजारात आला. जनावरे विकण्यासाठी आलेल्यांची मोठी गर्दी दिसत होती. मात्र खरीददार फिरकत नव्हते. यामुळे जनावरांचे दरही घटले असून याचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दिग्रस येथील बैलबाजार जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. दर शनिवारी येथे बैलबाजार भरतो. गत आठवड्यातील बैलबाजारात कधी नव्हे एवढी जनावरांची संख्या दिसून आली. यातही सर्वाधिक जनावरे शेतकऱ्यांची असल्याचे सांगण्यात आले. दिग्रस तालुक्यात गत तीन वर्षांपासून भीषण टंचाई आहे. या परिस्थितीने शेतकऱ्यांसोबत पशुपालकही त्रस्त झाले आहे. आता तर गावागावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नदी-नाले कोरडे पडले असून विहिरीत पाण्याचा थेंब नाही. माणसांना पाणी मिळत नाही तर जनावरांचे काय असा प्रश्न आहे. जनावरांचे हाल डोळ्याने पहावत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आता जनावरे विक्रीस काढली आहे. त्यामुळेच शनिवारच्या बैलबाजारात मोठ्या प्रमाणात गाई, म्हशी, बैल आदी जनावरे विक्रीसाठी आली होती. बाजारात विक्रेत्यांची संख्या अधिक असली तरी खरेदीदार मात्र अत्यल्प आहे. गोवंश हत्याबंदी कायद्यानंतर या जनावरांची खरेदी थांबली आहे. परिणामी जनावरांचे दरही कमी झाले आहे. ग्राहक मिळत नसल्याने शेतकऱ्याला गावावरून बाजारापर्यंत जनावरांना आणण्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास डोळ्यादेखत जनावरांना मरताना पाहण्याची वेळ येऊ शकते. या जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याची मागणी होत आहे. ८० हजाराची बैलजोडी ४० हजारात दिग्रसच्या बैलबाजारात जनावरांचे भाव घसरले आहे. त्या मागचे कारण म्हणजे ग्राहक मोजके आणि विक्रेते अधिक अशी परिस्थिती आहे. ७० ते ८० हजार रुपये किंमत असलेल्या बैलांची जोडी केवळ ४० ते ५० हजार रुपयात विकली जाते. अशीच अवस्था गाई आणि म्हशींची आहे. पाण्याची व्यवस्था नाही, चारा नाही, यामुळे नाईलाजाने जनावरे विकावे लागत आहे. परंतु बाजारातही खरेदीदार कुणी नाही. जनावर उपाशी मरु देऊ शकत नाही आणि बाजारात विकल्या जात नाही. अशा धर्मसंकटात आम्ही सापडलो आहोत. - महादेव भालेरावपशुपालक फेट्री ता. दिग्रस
बैलबाजारात ग्राहक मोजके अन् विक्रेते अधिक
By admin | Updated: May 16, 2016 02:42 IST