पाण्यासाठी दाम्पत्याचा मृत्यू : वडगाव तांडा येथील भीषण पाणीटंचाईमुळे तीन चिमुकल्यांचे भविष्य अधांतरी राजेश कुशवाह आर्णीपाण्यासाठी भटकंती आता नित्याची झालेली असताना तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र ही टंचाई जीवघेणी ठरत आहे. वडगाव तांडा येथे पाणी भरण्याच्या प्रयत्नात पती-पत्नीचा विहिरीत बुडून करुण अंत झाला. घोटभर पाण्यासाठी गेलेले आई-वडील कायमचेच गेल्याने त्यांची तीन चिमुकली लेकरे मात्र पोरकी झाली आहे. या हृदयद्रावक घटनेनंतरही तालुक्यातील पाणीटंचाईवर ठोस पाऊल उचलण्यासाठी प्रशासनात हालचालीचा पत्ता नाही.आर्णीपासून जवळच असलेल्या वडगाव तांडा येथील नागरिकांना गेल्या महिनाभरापासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. १७ एप्रिल रोजी गावापासून काही अंतरावरील एका विहिरीवर मोनिका माणिक जाधव आणि माणिक प्रेमसिंग जाधव हे पती-पत्नी गेले होते. मात्र खोल विहिरीतून पाणी काढताना त्या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. वडगाव तांडा वडगाव(गाढवे) गटग्रामपंचायतीत समाविष्ट आहे. गेल्या महिनाभरापासून पाण्याचे भयंकर दुर्भिक्ष येथे निर्माण झाले आहे. ८०० लोकवस्ती असलेल्या वडगाव तांडा येथे दोन विहिरी, दोन हातपंप आहेत. परंतु विहिरी आणि हातपंप पूर्णत: कोरडे पडले आहे. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याशिवाय गावकऱ्यांना पर्याय नाही. अशा परिस्थीतीत रोजमजुरी करून जगणाऱ्या मोनिका आणि माणिक जाधव या दाम्पत्याला एका शेतातील विहिरीतून पाणी आणावे लागत होते. रविवारी त्यांनी आपल्या मुलांना पाणी आणायला जातो, असे सांगितले. जगदीश कणिराम राठोड यांच्या शेतातील विहिरीवर पाणी भरताना मात्र घात झाला आणि दोघांचाही मृत्यू ओढवला. मोनिका पाय घसरून विहिरीत पडली. तिला वाचविण्यासाठी माणिकनेही उडी घेतली. पण दोघांनाही पोहणे येत नसल्यामुळे जीव गेला. पाण्यासाठी जीव गमाविणाऱ्या या मजूर दाम्पत्याच्या मागे कोमल (वय ७), बजरंग (वय ४) आणि प्रीतम ही चिमुकली तीन अपत्ये आहेत. त्यांच्या डोक्यावरून अचानक आई-वडिलांचे छत्र हरविल्याने त्यांचा हंबरडा गावकऱ्यांना हादरवून सोडणारा होता. ही तीनही मुले आई-बाबा पाणी घेऊन येणार म्हणून वाट पाहात होती. लहान मुलांचे रडणे पाहून मृत मोनिकाची जाऊ विहिरीकडे गेली असता तिला दोघांचेही मृतदेह तरंगताना आढळले. सासू-सासऱ्यांना माहिती दिल्यानंतर ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. कोमल पहिल्या वर्गात शिक्षण घेत आहे, तर प्रीतम व बजरंग तिच्यापेक्षाही लहान आहे. घरात हलाखी असताना आई-वडील हरविल्याने या मुलांच्या शिक्षणाचा आणि पालनपोषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीटंचाईमुळे वडगाव तांडा येथे दोन बळी गेले. ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्यावतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन नसल्यामुळे गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. दोन जीव गेलेल्या वडगाव तांडा या गावातील पाणीटंचाईवर विचार करताना आता तरी प्रशासनाने कोरडेपणा दाखवू नये, अशी मागणी करण्यात येत आहे.
आई गेली, बाबा गेले... डोळ्यात आले पाणी !
By admin | Updated: April 20, 2016 02:42 IST