बाभूळगाव : तालुक्यातील घारफळ येथील मध्यवर्ती बँकेच्या शाखेत २०१३-१४ मध्ये सोयाबीन पिकाचा विम्याचा शेतकऱ्यांनी भरणा केला. पीक विमासुद्धा मंजूर झाला आहे. परंतु विमा कंपनीतर्फे मंडळाप्रमाणे कमीजास्त प्रमाणात पैशाची मंजूरात मिळाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे एका निवेदनातून केली आहे. सारफळी हे गाव बाभूळगाव मंडळात येत असल्यामुळे सारफळवासियांना हेक्टरी चार हजार रुपये मंजूर झाले आहे. परंतु मध्यवर्ती बँकेच्या घारफळ शाखेने सारफळी विमाधारक यांच्या नावाने प्रति हेक्टरी १५०० रुपये घारफळ मंडळास मंजूर केले आहे. परंतु सारफळी गाव बाभूळगाव मंडळात येत असल्याने प्रती हेक्टरी चार हजार रुपये जमा करावयास पाहिजे होते. पीक विमा धारकांचे जिल्हा बँकेने नुकसान केल्याचा आरोपसुद्धा करण्यात आला आहे. यावर्षी विविध नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आधीच त्रस्त आहेत. खरिपाचा हंगामसुद्धा फारसा साथ देईल याची खात्री नाही. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना आधीच दुबार व तिबार पेरण्यांना सामोरे जावे लागले आहे. याप्रकरणी महसूल विभागाने चौकशी करून पीक विमा धारकांच्या खात्यावर उर्वरित रक्कम जमा करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी ज्ञानेश्वर उनपाणी, विलास खेवले, राजेंद्र खेवले, विलास वानखडे, मंदा गावंडे, जितेंद्र वेळुकार, दिवाकर गावंडे, चंद्रकला गोडे, जीवन ठाकरे, अरूण खेवले, कुसुम खवले, निर्मला दरणे, वसंतराव दरणे, सतीश सराड आदी शेतकऱ्यांनी केले आहे . (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना मिळाला पीक विम्याचा अत्यल्प मोबदला
By admin | Updated: September 17, 2014 00:04 IST