जुने वैमनस्य : बाभूळगाव तालुक्यातून दोघांना अटक यवतमाळ : जुन्या वैमनस्यातून युवकाचा धारदार शस्त्राने भरदिवसा सायंकाळी ५ वाजता खून करण्यात आल्याची घटना येथील धामणगाव मार्गावरील आयटीआय कॉलेजसमोर घडली. या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मृतकाचे नाव सुनील ऊर्फ वट्ट्या गोविंद पवार (२२) रा.अंबिकानगर असे आहे. सुनीलवर तीन ते चार युवकांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यामुळे तो घटनास्थळीच कोसळला. यावेळी हल्लेखोर पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या खुनामागील नेमके कारण स्पष्ट होवू शकले नाही. मृतक हासुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्यामुळे जुन्या वैमनस्यातून हा खून झाल्याची चर्चा होती. यातील दोन आरोपींना पकडण्यात एलसीबीच्या पथकाला यश आले. यामध्ये दुर्गेश विठ्ठल कडू (१८) रा. धामणगाव रोड व रिंकू अजय रामटेके (१८) रा. पाटीपुरा या दोघांचा समावेश आहे. या दोनही आरोपींना बाभूळगाव तालुक्यातील सुकळी पार्डी येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. दोनही आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे. या खुनातील मुख्य सूत्रधार हा रिंकू रामटेके असून यापूर्वी तो प्रणय खोब्रागडे याच्या खून प्रकरणात पोलिसांना हवा होता. तसेच दुर्गेशवर देखील पोलिसात गुन्हे दाखल आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींचा शोध सुरू केला. त्यातून त्यांना आरोपींचे लोकेशन हे बाभूळगाव असल्याचे कळले. या दोघांना पकडण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पतंगे, अमोल माळवे यांच्यासह शकील, गजानन डोंगरे, हरीश राऊत, प्रदीप नाईकवाडे, गणेश देवतळे यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)
अंबिकानगरातील युवकाचा आयटीआयसमोर खून
By admin | Updated: November 10, 2016 01:29 IST