यवतमाळ : शेतकरी आणि ग्रामीण जनता आर्थिक संकटाला तोंड देत आहे. सर्वच राजकीय पक्ष जनतेच्या मूळ मागण्यांना बगल देत असून सत्ता मिळविण्यासाठी आंधळे झाले आहेत. समाजाचे मेळावे घेवून पोट भरण्याचा व्यवसाय काही समाजसेवकांनी सुरू केला आहे. मात्र आपण जनहिताचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात करणाऱ्यांसोबतच जाण्याचा निर्णय ५ आॅक्टोबरला होणाऱ्या निर्धार मेळाव्यात घेतला जाणार आहे, अशी माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली.केंद्रात भाजपाचे सरकार आल्यास सातबारा कोरा करण्याचे, लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा, कापूस, सोयाबीन व धानाला देण्याचे, संपूर्ण महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे आश्वासन लोकसभा निवडणूक काळात देण्यात आले. मात्र या मागण्यांचा भाजपाला विसर पडला असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे. आपल्या जाहीरनाम्यात अन्न व निवारा, टोलमुक्त महाराष्ट्र, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, कापूस-सोयाबीन-धानासाठी राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारसीनुसार हमीभाव सर्व शाळांना दुपारचे जेवण अक्षयपात्र योजनेनुसार वृद्ध-निराधारांना अनुदान आदी बाबींचा समावेश करणाऱ्यांना पाठिंब्याचा ५ आॅक्टोबरच्या निर्धार मेळाव्यात निर्णय घेतला जाईल, असे तिवारी यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)
विदर्भ जनआंदोलन समितीचा जनहिताच्या प्रश्नांवर मेळावा
By admin | Updated: October 4, 2014 23:33 IST