नगरसेवक आक्रमक : नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत रस्त्याच्या वाढीव परिमाणालाही विरोध यवतमाळ : शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचे पडसाद नगरपरिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उमटले. नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत शहरातील पाणीटंचाईचे कोणतेही नियोजन नसल्याचा आरोप केला. सभा सुरू असताना युवक काँग्रेसचा पाण्यासाठी मोर्चा धडकल्याने एकच गोंधळ उडाला. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत रस्त्याच्या वाढीव परिमाणालाही नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. विविध प्रश्नांवरून नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. नगरपरिषदेच्या सभागृहात मंगळवारी सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष सुभाष राय यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. सुरवातीपासूनच नगरसेवक आक्रमक दिसत होते. या सभेत यवतमाळ शहरात ७०२ विंधन विहिरी आणि समायोजित झालेल्या भागाची ७७६ अशा ११७८ विंधन विहिरी असल्याची माहिती दिली. पाणीटंचाईच्या नियोजनात उपाययोजना झाली नाही. त्यामुळे आता अनागोंदी माजली असून, टॅँकर पळवून नेण्याचे प्रकार सुरू असल्याचे नगरसेवक अमोल देशमुख यांनी सांगितले. पाणीपुरवठा विभाग प्रमुखाने टंचाई नियोजनात बाजार अधीक्षक रवींद्र मानकर पहात असल्याचे सांगितले. यावरून सदस्य आणखीच संतप्त झाले. त्यावेळी उपाध्यक्ष मनीष दुबे यांनी टंचाई नियोजनासाठी अनुभवी कर्मचारी म्हणून मानकर यांच्या नियंत्रणात यंत्रणा राबवित असल्याचे सांगितले. विंधन विहिरी या २०० फुट खोल खोदल्या जात नाही, त्यामुळे अनेक भागातील विंधन विहिरी कोरड्या पडल्याचा आक्षेप नगरसेविका काळे यांनी घेतला. शहरातील डांबरीकरणाच्या कामावर वाढीव परिमाणाचा मुद्दा चर्चेला येताच नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, डॉ. अस्मिता चव्हाण यांनी विरोध दर्शविला. २३ टक्के कमी दराचे कंत्राट दिल्यानंतर आता वाढीव परिमाण कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला. हा मुद्दा ‘लोकमत’ने उजेडात आणला होता. यामुळे सभागृहात निर्णय झाला नाही. दलित वस्तीच्या निधीतील ७२ लाख लोखंडी पूल ते अप्सरा टॉकीज मार्गावर खर्च करण्याचे प्रस्तावित होते. यावर डॉ. अस्मिता चव्हाण यांनी आक्षेप घेत याची तक्रार करणार असल्याचे सांगितले. दलित वस्तीतील कोट्यवधी रुपये निधीतून आंबेडकरनगर परिसराचे अधिग्रहण करावे, असा प्रस्ताव ठेवला. स्थानिक आमदार, पालकमंत्री आणि नगरविकास राज्यमंत्री जिल्ह्यातील असल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी केली. त्यानंतर नाट्यगृह इमारतीचे काम, इंदिरानगरात आयएचएसडीपी योजनेतून समाज मंदिर, घरकूल लाभार्थ्याच्या यादीचा प्रस्ताव प्रवीण प्रजापती यांनी मांडला त्याला मान्यता देण्यात आली. नळजोडणीसाठी स्पेशल्स उपसाधने पुरविण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. फिरते शौचालय खरेदीला सदस्यांनी विरोध केला, त्याऐवजी सुलभ शौचालय बांधकाम करावे, असा प्रस्ताव सदस्यांनी सभागृहात ठेवला. तसेच यापूर्वी झालेल्या फिरते शौचालय खरेदीची चौकशी करण्याची मागणीही केली. शहरातील स्वच्छतेच्या कंत्राटाला एकमताने मंजुरी देण्यात आली. (कार्यालय प्रतिनिधी)युवक काँग्रेसचा पाण्यासाठी मोर्चा धडकला४बैठकीत पाणीटंचाईवर चर्चा सुरू असताना युवक काँग्रेसचा मोर्चा धडकला. नगराध्यक्षांनी बैठक थांबवून सभागृहा बाहेर जाऊन मोर्चेकऱ्यांशी चर्चा केली. पाणीटंचाई व स्वच्छतेच्या मुद्यावर ६ मे रोजी स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर बैठक पूर्ववत सुरू झाली. या मोर्चात चंद्रशेखर चौधरी, अरुण ठाकूर, उमेश इंगळे, घनश्याम अत्रे, नितीन मिर्झापुरे, शरीबभाई, प्रदीप डंभारे, दत्ता हाडपे, संदीप तेलगोटे, सिकंदरभाई, जितेश नावडे, प्रवीण घुगाणे, सौरभ शहाडे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते. डीप निळोणासाठी ५१ लाख४मिशन डीप निळोणा या प्रयास संस्थेच्या उपक्रमासाठी नगरपरिषदेने ५१ लाख रुपये देण्याचा ठराव मंजूर केला. स्वच्छता पुरस्काराच्या रकमेतून ही रक्कम देण्याचे एकमताने मान्य करण्यात आले. यासाठी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, योगेश गढीया यांनी सभागृहात भूमिका मांडली. यामुळे डीप मिशन निळोणाला आणखी गती मिळेल. सफाई कंत्राटावर विरोधकांची चुप्पी४सफाई कंत्राटाच्या निविदा प्रक्रियेवर उघडपणे विरोध करणाऱ्या सदस्यांनी सभागृहात चुप्पी साधली होती. त्यामुळे एकमताने सफाई कंत्राट मंजूर झाले. आधल्या रात्री घडलेल्या आर्थिक उलाढालीचा परिणाम असल्याचे दिसून येते. नवीन कंत्राट घेताना केवळ शहरापुरताच विचार करण्यात आला. वाढीव भागासाठी कोणतेही नियोजन नाही. येथील बाबा ताज रोजगार व स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था दिग्रस आणि गाडगे महाराज स्वच्छता आणि स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था यवतमाळ यांना कंत्राट देण्यात आले.
पाणीटंचाईने सभा गाजली
By admin | Updated: May 4, 2016 03:22 IST