सीईओंचा पुढाकार : बळीराजा चेतना अभियानाचे पुढचे पाऊल, २८ फेब्रुवारीला होणार सोहळायवतमाळ : आर्थिक तंगीपायी आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचणाऱ्या शेतकऱ्यांना जगण्याची प्रेरणा देण्यासाठी शासनाने बळीराजा चेतना अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलामुलींचा विवाह मेळावा घेण्यासाठी आता प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. हा विवाह मेळावा येत्या २८ फेब्रुवारी २०१६ रोजी होणार आहे. त्यातून जिल्ह्यातील शेकडो शेतकरी कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे. बळीराजा चेतना अभियानात गावोगावी भजन, कीर्तन, पथनाट्य असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. स्थानिक कलावंत आणि प्रबोधनकार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र प्रबोधनासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा तातडीने देण्याची गरज आहे. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सामूहिक विवाह मेळाव्याची संकल्पना मांडली. त्याला जिल्हा प्रशासनातील सर्व विभागाकडून दुजोरा मिळाला. २८ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या मुलामुलींचा विवाह मेळावा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हाभरातील शेतकरी कुटुंबीयांचा आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अंगणवाडीसेविका, ग्रामसेवक, तलाठी यांच्या माध्यमातून संबंधित गावातील शेतकरी कुटुंबातील उपवर मुलेमुली, आर्थिक तंगीत असलेली शेतकरी कुुटुंबे यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्हाभरातील माहिती गोळा झाल्यानंतर या मेळाव्याचे अंतिम नियोजन केले जाणार आहे. शिवाय इच्छूक शेतकरी कुटुंबातील मुलामुलींना स्वत:हूनही या मेळाव्यासाठी आपली नाव नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी त्यांना जिल्हा महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागणार आहे. मेळाव्यातील इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास विवाह मेळाव्यापूर्वी परिचय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या कामासाठी शासनाचे विविध विभाग, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते आदींचीही मदत घेतली जाणार आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे प्रामुख्याने मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या विवाहाच्या खर्चाचा मोठा प्रश्न असतो. या दोन खर्चांची पूर्ती करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आपली नाचक्की झाल्याची भावना निर्माण होते. त्यातूनच खचलेला शेतकरी आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचतो. त्यामुळे प्रशासनाने बळीराजा चेतना अभियानात पुढचे पाऊल टाकत सामूहिक विवाह मेळाव्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)मुलीच्या सासरी शौचालयाची भेटशेतकरी मुलामुलींच्या सामूहिक विवाह मेळाव्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा प्रशासनाला आहे. या मेळाव्यामध्ये लग्न केल्यानंतर मुलगी सासरी जाण्यापूर्वी सासरच्या घरी प्रशासनातर्फे पक्के शौचालय बांधून देण्यात येणार आहे. तसेच मुलीच्या आईच्या नावाने १० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर विवाह मेळाव्यात सहभागी होणाऱ्यांसाठी प्रतिलाभार्थी शासनातर्फे दोन हजार रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकरी मुला-मुलींचा विवाह मेळावा
By admin | Updated: December 16, 2015 02:46 IST