दिग्रस : सहा महिन्यांहून अधिक कालावधीपासून संगणक परिचालकांना मानधन मिळाले नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. शासनाच्या जाचक अटींमुळे हजारो संगणक चालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे, दिग्रस तालुक्यात संगणक चालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मागील संग्राम प्रकल्पाची मुदत डिसेंबर २०१५ मध्ये संपलेली असताना मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी दिलेल्या आश्वासनामुळे राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परीचालकांनी विना मानधन काम सुरु ठेवले होते, त्यातच शासनाच्या ११ आॅगस्ट २०१६ च्या शासन निर्णयानुसार संग्राम प्रकल्पाऐवजी सरकार सेवा केंद्र या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. परंतु शासन निर्णयातील १५ लाख रुपये उत्पन्न, निधीच्या जाचक अटीमुळे सरकार सेवा केंद्राची संख्या कमी झाली व परिणामी राज्यातील सुमारे ५५०० संगणक परीचालकांना घरी बसावे लागले. पूर्वीच्या संगणक परीचालकांना नियुक्ती दयावी या मागण्यांसाठी संगणक परिचालक संघटनेने दिग्रस पंचायत समिती येथे निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)
दिग्रसमधील संगणक परिचालक मानधनाविना
By admin | Updated: March 8, 2017 00:27 IST