कीर्तन महोत्सव : कीर्तनचंद्रिका रोहिणी परांजपे यांचे निरुपनपुसद : संत परंपरेने भगवंताला सगुण रुपात मानले आहे. भगवंताला मानणारे काही असतात तर काही न मानणारे असतात. ही परिस्थिती पूर्वीही होती आणि आजही आहे. माणसाला माणसात माणूस दिसत नाही, त्यांना पाषाणात देव कसा दिसणार त्यासाठी सगुण भाव असावा लागतो, असे प्रतिपादन कीर्तन चंद्रिका रोहिणी परांजपे-माने यांनी येथे केले. पुसद येथील गजानन महाराज मंगल कार्यालयात सहकारसूर्य श्रीराम आप्पा आसेगांवकर रौप्य महोत्सवी स्मृतिदिनानिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवात त्या प्रथम पुष्प गुंफताना निरुपन करीत होत्या. जगाच्या शर्यतीमध्ये प्रत्येक माणूस भावनाशून्य होऊन मी कसा पुढे राहतो, माझे कुटूंब कसे पुढे राहते यासाठी सारखा धावतो असतो. व्यवहारामध्ये जसे नाम आणि रुप याला अत्यंत महत्व असते तसे परमार्थामध्येही नाम आणि रुप याला महत्व आहे. मुखाणे निर्गुण राहण्यापेक्षा भगवंताचे नाम घेऊन सगुण भाव वाढविला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. मंदिरांच्या अधिष्ठानांमध्ये आम्ही देव पाहतो, तेथेच सगुणरुपी देवाची अनुभूती होत असल्याचे त्यांनी विशद केले. कीर्तनाला हार्मोनियमवर प्रा.चंद्रकिरण घाटे, तबल्यावर संजय कोरटकर यांनी साथसंगत दिली. प्रास्ताविक डॉ.उत्तम रुद्रवार यांनी केले. यशस्वीतेसाठी कृषीभूषण दीपक आसेगांवकर व आसेगांवकर परिवार यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
माणसात माणूस दिसत नाही, त्यांना पाषाणात देव कसा दिसणार
By admin | Updated: September 25, 2014 23:34 IST