वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वणी विधानसभा मतदार संघात शाखा स्थापनेचा धडाका सुरु केला. दररोज किमान १0 ते १२ गावांमध्ये शाखा स्थापन करण्यात येत आहे. दुसरीकडे कॉंग्रेसमध्ये बंडखोरीची तयारी सुरू असून महायुतीत उमेदवारीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.वणी विधानसभा मतदार संघात तूर्तास केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच निवडणूक तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. पक्षाने स्वतंत्रपणे नांदेपेरा मार्गावर ‘शिवनेरी’ नामक कार्यालयही सुरू केले आहे. या कार्यालयात दररोज कार्यकर्त्यांचा राबता सुरू झाला आहे. दररोज शाखा स्थापन करण्यासाठी मनसेच्या जिल्हा परिषद सदस्य अल्का टेकाम, पंचायत समिती सदस्य मिलींद पाटील व इतर पदाधिकारी जिवाचे रान करीत आहे. जिल्हाध्यक्ष राजू उंबरकर यांनी स्वत: निवडणुकीची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहे. दररोज पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. मनसेची निवडणूक तयारी सुरू असताना कॉंग्रेसमध्ये बंडखोरीची तयारी सुरू झाली आहे. विद्यमान आमदार वामनराव कासावार यांना त्यांच्याच गोटातील ‘विश्वासूं’कडून सुरूंग लावण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यातूनच येत्या शुक्रवारी १९ सप्टेंबरला काही ‘पत्ते’ उघड होण्याची शक्यता आहे. मात्र संभाव्य बंडखोरीही कासावार यांच्या पथ्यावर पाडण्यासाठीच केली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेसमध्ये एकमेव कासावार यांचेच नाव उमेदवारीसाठी पुढे आले असले, तरी निवडणुकीत ‘तिसरा’ प्रबळ उमेदवार राहण्यासाठीच व्यूह रचना आखली जात आहे.महायुतीत तर अद्याप संभ्रमावस्था कायम आहे. अद्याप महायुतीच झाली नसल्याने युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सैरभैर झाले आहे. त्यातच मुंबई, दिल्लीत जोरदार घडामोडी सुरू असल्याने युतीचे कार्यकर्ते युती तुुटणार की कायम राहणार, याबाबत साशंकीत आहेत. त्यातच युती झाली तरी उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. निष्ठावंत की नवखा, आपला की परका, घरचा की बाहेरचा, युतीचा उमेदवार नक्की कोण, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. स्पर्धेतील मातब्बर उमेदवारही अद्याप संभ्रमातच आहे. त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व्दिधा मनस्थितीत दिसत आहे.महायुतीचे जागा वाटप रखडल्याने भाजपानेही आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. तथापि भाजपातही उभे दोन गट दिसून येत आहे. युती तुटल्यास भाजपचा उमेदवार नक्कीच मैदानात राहणार आहे. मात्र तो कोण असेल, हे युती तुटल्यानंतरच कळणार आहे. दुसरीकडे महायुती झालीच अन् शिवसेनेने ‘दुसऱ्या’च उमेदवाराला उमेदवारी बहाल केली, तर काय करायचे याचा खलही भाजपात सुरू आहे. लोकसभेत अहीर यांना विरोध करणाऱ्यांच्या पाठीशी कसे राहावे, असा प्रश्न भाजपामध्ये उपस्थित केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
महायुती, आघाडीत संभ्रमावस्था कायम
By admin | Updated: September 17, 2014 00:03 IST