महागाव(कसबा) : दारव्हा तालुक्यातील महागाव(कसबा) ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच आटोपली. नवे सदस्यही निवडून आले. मात्र जुने सरपंच व सदस्य यांना जनतेने नाकारले. अनेकांची घरवापसी झाली. मात्र नवीन सरपंच, उपसरपंच यांची अद्याप निवड झालेली नाही. त्यामुळे नवीन उमेदवारांना सध्याच काम करण्याची दिशा मिळालेली नाही. त्यामुळे येथील गावकरी अनेक सुविधांपासून वंचित आहे. नवे पदाधिकारी नसल्याने गावकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. गावात पावसाळा असूनही पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती सुरू आहे. पाणीपुरवठा योजनेच्या गावात दोन विहिरी आहेत. तसेच एक मोठी टाकीसुद्धा आहे. संपूर्ण गावात नळ योजना आहे. पण, काही ठिकाणी हँडपंप बंद आहे. मध्यंतरी पाऊस नसल्यामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेली. गावात कुठेही दिवाबत्ती नाही. नाल्यांची साफसफाई नाही. त्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गावातील ही सर्व कामे करण्यासाठी सरपंच व उपसरपंच यांची निवड होणे गरजेचे आहे. त्यानंतरच कामांना गती येईल, अशी गावकऱ्यांना अपेक्षा आहे. गावातील समस्यांबाबत नागरिक ग्रामपंचायतीमध्ये चकरा मारत आहेत. मात्र त्यांना विहिरीवरची मोटर बंद आहे, विद्युत पुरवठा बंद आहे, ग्रामसेवक आले नाही, आम्हाला पगार मिळत नाही, गावातील नागरिक घर टॅक्स, पाणी कर भरत नाही, अशी उत्तरे कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहे. गावातील समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने तातडीने सरपंचाची निवड करावी किंवा तात्पुरता प्रशासक नेमावा, अशी मागणी गावकरी करीत आहेत. (वार्ताहर)
महागाव(क) ग्रामपंचायत वाऱ्यावर
By admin | Updated: August 7, 2015 02:21 IST